कोल्हापूर, 19 फेब्रुवारी : राज्यातील सर्व ग्राहकांपर्यंत वीज पोहोचविण्यासाठी महावितरणला सरासरी 7 रुपये 35 पैसे प्रति युनिट इतका खर्च येतो. पण शेतकऱ्यांना केवळ दीड रुपया प्रती युनिट दराने वीजपुरवठा केला जातो. म्हणजे शेतकऱ्यांना मूळ खर्चाच्या ऐंशी टक्के सवलत दिली जाते. हा दर मीटरने वीजपुरवठा होतो, त्या शेतीपंपांसाठीचा आहे. मीटर नसेल तर कृषी पंपांना प्रती हॉर्सपॉवर दर महिना 266 रुपये द्यावे लागतात. शेतकऱ्यांना वीजदरात सर्वाधिक सवलत मिळते अशी माहिती महावितरणचे व्यवस्थापकीय अध्य विजय सिंघल यांनी केली आहे. यावर माजी खासदार राजू शेट्टी यांनी सिंघल यांच्यावर जोरदार टीका करत त्यांनी सिंघल यांची पोलखोल केली आहे.
यावेळी शेट्टी म्हणाले की, महावितरणचे अध्यक्ष तथा कार्यकारी संचालक विजय सिंघल हे राज्यातील शेतकऱ्यांना 7 रूपये 35 पैसे दराने तयार होणारी वीज 1 रूपये 50 पैसे दराने देवून 85 टक्के सवलत देत असल्याचा बागलबुवा करत आहेत. राज्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या जमीनी व घरे संपादित करून धरणे बांधून त्याठिकाणी जलविद्युत प्रकल्प उभारण्यात आली आहेत. या विद्युत प्रकल्पातून तयार होणाऱ्या प्रतियुनिट वीजेचा खर्च 25 ते 50 पैसे इतका आहे. हे प्रकल्प खाजगी लोकांना चालविण्यास दिले जात असून 50 पैसे युनिटने तयार होणारी वीज त्यांच्याकडून 3.50 पैसे ते 5.50 पैसे दराने वीज खरेदी करून ग्राहकांच्या माथी 8 रूपयाने मारली जात असल्याची माहिती शेट्टींनी दिली.
हे ही वाचा : छत्रपतींच्या आशीर्वादामुळेच आम्हाला धनुष्यबाण मिळालं - मुख्यमंत्री शिंदे
महावितरणची वीज वितरण गळती प्रत्यक्षात 30 टक्के आहे. शेती पंपांचा खरा वीज वापर 15 टक्के आहे. पण कागदोपत्री बनवाबनवी करून राज्य सरकारला सांगितले जाते. शेतीपंपांची वीज वापर 30 टक्के आहे आणि गळती पंधरा टक्के आहे. प्रत्यक्षात शेती पंपांची बिले दुप्पट करून शेती पंप वीज वापर 30% दाखविला जात असल्याचेही ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, राज्य मंत्री मंडळाचीही दिशाभूल केली जात आहे. हा प्रकार गेली 10 वर्षे सातत्याने सुरू आहे. तो आम्ही संबंधित प्रत्येक सरकारच्या निदर्शनास आणला आहे. शेती पंप वीज वापर या नावाखाली लपविलेली ही अतिरिक्त पंधरा टक्के गळती म्हणजे दरवर्षी किमान 12 हजार कोटी रुपयांची चोरी व भ्रष्टाचार आहे.
सातारा जिल्ह्यात जिल्हा नियोजन मंडळातून आयपीडीएस योजनेअंतर्गत 5 कोटी रूपयाचे एक काम एका ठेकेदाराने 3 टक्के बिल भरणाऱ्या ठेकेदाराला थांबवून 12 टक्के जादा दराने निविदा भरलेल्या ठेकेदारास हे टेंडर देण्यास तेथील पालकमंत्री व अधिक्षक अभियंता संबधित ठेकेदारावर निविदा माघार घेण्यास दबाव आणत असल्याची माहिती शेट्टींनी दिली.
हे ही वाचा : शिवसेना नाव आणि चिन्ह मिळवण्यासाठी 2 हजार कोटींचा सौदा, संजय राऊतांचा खळबळजनक आरोप
या दोन्ही कंपन्यांमधील भ्रष्टाचार, अकार्यक्षमता आणि नियोजनाचा संपूर्ण अभाव यामुळे महावितरण तोट्यात जात आहे. याबद्दल बोलायला विजय सिंघल यांची दातखीळी बसली आहे काय ? शेतकऱ्यांना जादा शहाणपण शिकविण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा अजून बऱ्याच भानगडी माझ्याकडे आहेत पाहिजे असल्यास प्रकाशगड समोर घोंगडे टाकून हिशोबाला बसूया मग समजेल कोण किती पाण्यात आहे ते असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.