मुंबई, 23 मार्च : महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. परिस्थितीत दिवसेंदिवस चिंताजनक होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपले बंधू आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे. त्यांनी आपल्या भावाच्या कामाचं कौतुक करत जनतेला आवाहन केलं आहे.
'मी कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोललो. ते ज्या प्रकारे काम करत आहेत. ते योग्य प्रकारे करत आहेत.' अशा शब्दात राज यांनी पहिल्यांदाच मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांचं कौतुक केलं आहे.
'जी लोकं डॉक्टरांवर हात उचलत होते, त्यांना आज जाणीव झाली असेल. लोकांना आज गांभीर्य समजत नाहीये. जनता कर्फ्यू टेस्ट केस होती, तरी लोकांनी ऐकलं नाही तर कडक पावलं उचलावी लागतील. व्हायरस पसरला तर तो आवरण्यासाठी यंत्रणा आहेत का? जनता कर्फ्यूनंतर टाळ्या वाजवण्यासाठी लोकं टोळक्याने बाहेर येत होते. जल्लोष करत होते. लोकांना काही गांभीर्य आहे की नाही? प्रत्येकाच्या घरावर टकटक झाली तरच आपण ऐकणार का?' असा संतप्त सवाल राज यांनी उपस्थितीत केला.
'कोरोना आपल्या मागे हात धुऊन लागला आहे. जनतेला हात जोडून विनंती आहे. हे प्रकरण सहज घेऊ नका. निर्बंधांची 31 मार्चची तारीख पुढे जाणार असंच चित्र आहे. आज जी लोकं टोलनाक्यावर गर्दी करत आहेत. त्यांना विनंती घरी बसा. जे काही चालू आहे ते आपल्या जगण्यासाठी चालू आहे', असं आवाहनही राज ठाकरे यांनी लोकांना केलं.
'डॉक्टरांना परिवार नाही का? जीव धोक्यात घालून ती लोकं आपल्यासाठी लढत आहेत. पण काही लोकं रस्त्यावर उतरून पोलिसांसोबत हुज्जत घालत आहेत. लाज वाटत नाही का? ज्या गोष्टी आपणहून पाळायला पाहिजे त्या पाळणं आवश्यक आहे. अनेकांच्या हातावर घरी राहण्यासाठी स्टँप मारले आहे आणि ती लोकं ते बिंधास्त बाहेर फिरत आहे. मूठभर लोकांना जर समज येत नसेल तर सरकारने कठोर निर्णय घेणे आवश्यक आहे.' अशी मागणीही त्यांनी सरकारकडे केली आहे.
जे या कठीण प्रसंगी मदतकार्य करत आहेत. त्या सर्व डॉक्टर पोलिसांना धन्यवाद देतो, अशा शब्दात राज यांनी आभार मानले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.