नवी दिल्ली, 05 फेब्रुवारी: कमी वयात होणाऱ्या लग्नानं माता मृत्यूचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे मुलीचं लग्नाचं 18 वर्षं हे वय धोक्याचं ठरत असल्यानं ते 21 वर्ष होण्याची शक्यता आहे. इकॉनॉमिक टाईम्स वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार सरकार यासंदर्भात गांभीर्यानं विचार करत आहे. यामागे माता मृत्यूदर कमी करणं हे प्रमुख कारण आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर करताना महिलांच्या आई बनण्याच्या योग्य वयासंदर्भात सल्ला देण्यासाठी एका समितीची नेमणूक करण्याची घोषणा केली होती. सरकारच्या या निर्णयामागे सुप्रीम कोर्टाचा एक महत्वाचा निर्णय आहे. आजच्या घडीला मुलीच्या लग्नाचं वय 18 वर्षं असून मुलाचं वय 21 इतकं आहे. काय आहे नेमकं प्रकरण? सुप्रीम कोर्टानं 2017 मध्ये या संदर्भात एक महत्वाचा निर्णय दिला. वैवाहिक बलात्कारापासून मुलींना वाचवण्यासाठी बाल विवाह पूर्णपणे अवैध मानायला हवा असं सांगत कोर्टानं मुलींच्या लग्नाचं वय ठरवण्याचा निर्णय सरकारवर सोपवला होता. दुसऱ्या बाजुला मुलींचं आई बनण्याचं वय 21 वर्ष केलं तर महिलांना मुलांना जन्माला घालण्याची क्षमता असलेलं वय कमी होईल असाही अनेकांचा आक्षेप आहे. युनिसेफच्या आकडेवारीनुसार भारतात 27 टक्के मुलींची लग्न 18 वर्षाच्या आत आणि 7 टक्के मुलींचं लग्न 15 वर्षाच्या आत केली जातात. भारतातील अनेक राज्यात आणि समुदायात आजही बालविवाह ही सामान्य गोष्ट आहे. बालविवाह रोखण्यासाठी भारतात अनेक कडक कायदे आहेत. तरीही बालविवाहाची प्रकरणं सातत्यानं समोर येतात. लग्नाच्या वयाचे कायदे:
- विवाहाचं वय किती असावं यावर भारतात अनेक वर्षं मोठी चर्चा सुरु आहे. इंग्रजांच्या काळात पहिल्यांदा लग्नासंदर्भातला कायदा करण्यात आला. यात काळानुरुप अनेक बदलही करण्यात आले. त्यानुसार मुलाचं लग्नाचं वय 21 आणि मुलीचं वय 18 करण्यात आलं.
- 1955 साली हिंदू विवाह कायदा बनवला गेला. हा कायदा हिंदूंसोबतच जैन, शिख आणि बौद्धांनाही लागू होता. पण 2012 मध्ये शिखांसाठी वेगळा आनंद विवाह कायदा लागू करण्यात आला. हिंदू विवाह कायद्यानुसार मुलाचं वय कमीत कमी 18 तर मुलीचं वय कमीत कमी 15 वर्ष असणं गरजेचं होतं.
- पारसी विवाह कायद्यानुसार मुलाचं वय 18 आणि मुलीचं वय 15 वर्षं असणं गरजेचं होतं.
- 1978 मध्ये बाल विवाह कायद्यात संशोधन करण्यात आलं. यात मुलाचं लग्नाचं वय कमीत कमी 21 वर्षं तर मुलीचं लग्नाचं वय कमीत कमी 18 वर्षं करण्यात आलं. हा कायदा सर्व धर्मांना लागू करण्यात आला.
- वर्ष 2018 मध्ये लॉ कमिशनने मुलगा आणि मुलीच्या लग्नाच्या वयात मुलगी कमी वयाची आणि मुलगा जास्त वयाचा असणं म्हणजे रुढीवादाला प्रेरणा देणारी कृती असल्याचं सांगितलं. शिवाय याला कुठलाही वैज्ञानिक आधार नसल्याचंही स्पष्ट केलं.