मुंबई, 25 जून : जगभरात कोरोना व्हायरसमुळे हाहाकार उडाला आहे. कोरोनावर लस शोधण्याचे काम प्रत्येक देश करत आहे. अशातच बाबा रामदेव यांनी कोरोनावर शंभर टक्के मात करता येईल असे कोरोनिल औषध लाँच केले. पण, आयुष मंत्रालयानंतर आता राज्य सरकारने पतंजलीला चांगलाच झटका दिला आहे.
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही कोरोनिल औषधाबाबत आपली रोखठोक भूमिका मांडली आहे. 'पतंजलीने क्लिनिकल ट्रायल घेतल्या की नाही हे जयपूरची नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ मेडीकल सायन्सेस शोधून काढेल. नाही तर अशा खोट्या औषधाची विक्री महाराष्ट्रात करू दिली जाणार नाही' असं अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.
विशेष म्हणजे, याआधीही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील कोरोनिल औषधावर संशय व्यक्त केला होता. 'ज्या लोकांना बाबा रामदेव यांच्यावर विश्वास आहे. त्यांनी हे औषध खरेदी करावे', अशी भूमिका अजित पवारांनी मांडली होती.
The National Institute of Medical Sciences, Jaipur will find out whether clinical trials of @PypAyurved's 'Coronil' were done at all. An abundant warning to @yogrishiramdev that Maharashtra won't allow sale of spurious medicines. #MaharashtraGovtCares#NoPlayingWithLives
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) June 24, 2020
कोरोनिल सापडले वादाच्या भोवऱ्यात
दरम्यान, बाबा रामदेव यांनी कोरोनिल औषधाचे सेवन केल्यावर 100 टक्के कोरोना रुग्ण बरा होत असल्याचा दावा केला होता. मात्र, हे औषध लाँच झाल्याचा काही तासांतच वादाच्या भोवऱ्यात सापडले. कोरोनावर हे औषध प्रभावी ठरत असल्याचा हा दावा जो पतंजलीने केला आहे तो सरकार आणि प्रशासनाने खोडून काढला आहे.
पेट्रोलला मागे टाकत डिझेलनं गाठली ऐंशी! हे आहेत मुंबई ते दिल्ली आजचे दर
एवढंच नाहीतर केंद्र सरकारने पतंजलीला नोटीस बजावली. या औषधाबाबत आपल्याला माहिती नसल्याचं म्हणत याबाबत आधी सविस्तर माहिती द्या अशा सूचना आयुष मंत्रालयाने पतंजलीला दिल्या होत्या. त्याचबरोबर पूर्ण पडताळणी होईपर्यंत कोरोनिलची जाहिरात थांबवावी, असे आदेश देत केंद्रीय आयुष मंत्रालयाने पतंजलीला दणका दिला.
पतंजलीला खोकला-तापाच्या औषधासाठी परवाना
तसंच, केंद्र सरकारनंतर उत्तराखंड सरकारनेही पतंजलीला नोटीस बजावली. उत्तराखंड सरकारने पतंजलीला खोकला-तापाच्या औषधासाठी परवाना दिल्याचं स्पष्ट केले आहे. पतंजलीने केलेल्या अर्जामध्ये कोरोना व्हायरसचा उल्लेख नव्हता असं सांगितलं. पतंजलीला कोरोना किटसाठी परवानगी कशी मिळाली, याचे उत्तर देण्याचे आदेश राज्य सरकारने दिले. तर पतंजलीने या औषधाचं जयपूरच्या निम्समध्ये ट्रायल केल्याचं सांगितलं. मात्र निम्समध्ये कोरोनाच्या औषधाच्या ट्रायलसाठी मंजुरी दिली नव्हती असं राजस्थानच्या आरोग्य मंत्र्यांनी सांगितलं.
जयपूरमध्ये गुन्हा दाखल
जयपूरमधील डॉक्टर संजीव गुप्ता यांनी बाबा रामदेव यांच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. कोरोनाच्या औषधाचा दावा करून बाबा रामदेव यांनी त्यांची दिशाभूल केली, असा गुप्ता यांनी तक्रारीत आरोप केला आहे. तसंच, आयसीएमआरच्या परवानगीशिवाय औषध कसे सुरू करण्यात आले? असा सवालही उपस्थितीत करण्यात आला.
संपादन - सचिन साळवे