अमरावती, 22 मे: अमरावती शहराच्या महादेव खोरी परिसरातील वनविभागाच्या राखीव जंगलात (Mahadev Khori Forest) 17 वर्षीय मुलाचा आणि 16 वर्षीय मुलीचा झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्यानं (Found two dead bodies) एकच खळबळ उडाली आहे. संबंधित मृतदेह गेल्या तीन-चार दिवसांपासून लटकलेले असावेत, असा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे. दोन्ही मुलं मागील 13 मेपासून बेपत्ता होती. या दोघांनी आत्महत्या केली की, हा घातपात आहे? याबाबत संभ्रम तयार झाला असून पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
मयूर अमेंद्र कांबळे (वय-17) आणि गायत्री (वय-16) अशी मृतांची नावं नावं असून दोघंही अमरावतीतील रहिवासी आहेत. संबंधित दोघांचे मृतदेह गुरुवारी (20 मे) दुपारी महादेव खोरी परिसरातील एका जंगलात सागाच्या झाडाला लटकावलेल्या अवस्थेत सापडले आहेत. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोघांचे मृतदेह झाडावरून खाली उतरवले. दोन्ही मृतदेहाचा दुर्गंध परिसरात पसरला होता.
दोन्ही मृतदेह मागील तीन ते चार दिवसांपासून लटकलेल्या अवस्थेत असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात आला आहे. मयूर आणि गायत्री घरात न दिसल्यामुळे दोघांच्या कुटुंबीयांकडून दोन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गायत्रीच्या कुटुंबीयांनी 13 मे रोजी राजापेठ ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. तर मयूरच्या कुटुंबीयांनी 14 मे रोजी फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
हे ही वाचा-अपहरण झालेल्या नातीचा आजोबांना दीड वर्षानं आला फोन,हाल ऐकून सरकली पायाखालची जमीन
दोन्ही प्रकरणात पोलिसांनी अज्ञातांविरोधात अपहरण केल्याचा गुन्हा दाखल केला होता. पण गुन्हा दाखल झाल्यानंतर सहा दिवसांनी दोघांचे मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत सापडल्यानं कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनचं सरकली आहे. संबंधित दोघांनी आत्महत्या केली की, हा घातपात आहे? याबाबतचा तपास पोलिसांकडून केला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.