नवी दिल्ली, 14 सप्टेंबर : देशभरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाची संख्या वाढत असल्यामुळे चिंतेचं वातावरण आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जळजळीत टीका केली आहे. राहुल गांधी यांनी ट्वीट करून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या या आठवड्यात 50 लाख तर अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ही 10 लाखांच्या घरात पोहोचली आहे. लॉकडाउनचे योग्य नियोजन न करता आल्यामुळे एका व्यक्तीच्या अहंकारामुळे देशभरात कोरोनाचा उद्रेक झाला आहे, अशी जळजळीत टीका राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर केली.
तसंच,‘मोदी सरकार म्हणाले की, आत्मनिर्भर व्हा, याचा अर्थ असा होत आहे की, तुम्ही तुमचा जीव स्वत: वाचवा, कारण पंतप्रधान हे मोरांसोबत व्यस्त आहे, अशी खिल्लीही राहुल गांधींनी उडवली. कोरोनाच्या मुद्द्यावरून पावसाळी अधिवेशानात मोदी Vs काँग्रेस! दरम्यान, पूर्ण देशात सध्या कोरोनाचं संकट आहे. रोजच्या वाढत्या कोरोनाच्या रुग्णांमुळे चिंतेचं वातावरण असताना यात आता संसदेचं पावसाळी अधिवेशन (monsoon session of parliament 2020) सुरू झाले आहे. आजपासूनच (सोमवार, 14 सप्टेंबर) अधिवेशनाला सुरुवात होणार असून 1 ऑक्टोबरपर्यंत याचं कामकाज चालू असणार आहे. या अधिवेशनात कोरोनाच्या मुद्द्यावरून विरोधक मोदी सरकारला घेरण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, पहिल्यांदाच संसदेच्या दोन्ही सभागृहांचं अधिवेशन एकत्र घेण्यात आलं आहे. तर सामाजिक अंतर ठेवतच संसदेत खासदारांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. महत्त्वाच्या राजकीय पक्षांना मेन चेंबर आणि विजिटर्स गॅलरीमध्ये जागा नियुक्त करण्यात आल्या आहेत. आता यातल कोणती जागा कोणत्या खासदारासाठी घ्यायची याचा निर्णय त्या-त्या राजकीय पक्षांवर आहे. अधिवेशनाच्या कार्यकाळात कोणतेही खासदार एकमेकांच्या संपर्कात येऊ नये यासाठी प्लास्टिकच्या शीटचाही वापर केला असल्याची माहिती मिळत आहे. इतकंच नाही तर खासदारांना ‘अटेंडन्स रजिस्टर’ अॅपद्वारे हजेरी लावण्याची परवानगी देण्यात आली आहे.