बुलडाणा, 24 एप्रिल : बुलडाणा जिल्ह्यात माणुसकी हरवल्याने मन सुन्न करणारी घटना घडली आहे. एका आजाराने मृत्यू झालेल्या व्यक्तीवर त्याच्या नातेवाईकांनी आणि गावकर्यांनी अंत्यविधीसाठी नकार दिल्याने तब्बल चार तासानंतर प्रशासनाने दखल घेत शासकीय अधिकाऱ्यांनी या व्यक्तीचा अंत्यविधी पार पाडला. या चार तासात मात्र कोणीतरी आमच्या वडिलांचा अंत्यविधी करण्यासाठी पुढे येईल का असा चिमुरड्यांनी टाहो फोडला.
खामगाव तालुक्यातील रोहन येथील अंकुश देशमुख हे आजारी असल्याने त्यांच्यावर बुलडाणा येथील जिल्हा क्षयरोग रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचे पार्थिव हे रुग्णवाहिकेतून त्यांच्या रोहना या गावात आणण्यात आले. मात्र भीतीपोटी त्यांच्या जवळच्या नातेवाईकांसह गावकर्यांनी देखील अंकुश देशमुख यांच्यावर अंतिम संस्कार करण्यास नकार दिला.
नातेवाईकांनी अंत्यविधीला नकार दिल्यानंतर स्मशानभूमीत अंकुश यांच्या प्रेताजवळ त्यांची आई पत्नी आणि दोन चिमुकली मुले तब्बल चार तास टाहो फोडत होते. मात्र कुणीही समोर आलं नाही. याबाबत माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने तहसीलदार यांनी कर्मचारी पाठवून अंकुश देशमुख यांच्यावर अंतिम संस्कार केले.
हेही वाचा- धक्कादायक! हॉटस्पॉट मुंबईतून महिला थेट अहमदनगरमध्ये दाखल, नागरिकांनी विरोध केल्यानंतर...
कोरोनाच्या संकटकाळात काही ठिकाणी माणुसकीची नवनवी उदाहरणे समोर येत असताना बुलडाण्यात मात्र माणुसकी हरवल्याचा प्रकार घडला. कोरोनाच्या भीतीने लोक किती हादरले आहेत, हे या घटनेनंतर पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.
संपादन - अक्षय शितोळे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus