हलीमा कुरेशी, सुपा, अहमदनगर– 26 जानेवारी : भूमाता रणरागिणी ब्रिगेडच्या महिला आज शनीच्या चौथर्यावर चढून दर्शन घेऊ शकणार की नाही, हाच आज दिवसभर चर्चेचा विषय होता. पण पोलिसांनी त्यांना आधीच ताब्यात घेतल्यामुळे या महिला शिंगणापूरपर्यंत पोहचूच शकल्या नाहीत. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सोडून दिलं. पण आजचा दिवस सस्पेन्सने भरलेला आणि नाट्यपूर्ण होता.
सकाळी 10 वाजता भूमाता रणरागिणी ब्रिगेडच्या महिला पुण्यातल्या स्वारगेट परिसरातून निघाल्या. त्यांनी आधीच जाहीर केलं होतं की 26 जानेवारीच्या दिवशी त्या शिंगणापुरातल्या शनी चौथर्यावर चढून शनीचं दर्शन घेणार. परंपरेनुसार तिथे महिलांना चढायला परवानगी नाहीये. त्यामुळे गावकर्यांनी महिलांच्या आंदोलनाला विरोध केला. अशा तापलेल्या वातावरणात, अनेक ठिकाणी थांबत थांबत रगणरागिणी निघाल्या. अखेर दुपारी 4 वाजता त्या सुप्याला पोहोचल्या. पोलिसांनी इथे आधीच नाकाबंदी करून ठेवली होती. गाडी थांबल्यामुळे तृप्ती देसाई आणि त्यांच्या ब्रिगेडमधल्या रणरागिणींनी तिथेच ठिय्या आंदोलनाला सुरुवात केली.
हे आंदोलन राज्यातल्या आणि देशातल्या सगळ्या न्यूज चॅनल्सनी थेट घरोघरी पोहचवली. त्यामुळे आता ब्रिगेडच्या महिला परंपरा मोडून शनीचं दर्शन चौथर्यावर चढून घेऊ शकणार का, अशी चर्चा देशभर सुरू झाली. पण वातावरण बिघडू शकतं, हे पाहताच पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली. जमाव बंदी मोडून धरणं धरल्यामुळे कलम 145 आणि कलम 149 अंतर्गत कारवाई करत पोलिसांनी सर्व महिलांना ताब्यात घेतलं.
महिलांना ताब्यात घेतल्याचं कळताच तिकडे शिंगणापूरमधल्या गावकर्यांनीही आंदोलन मागे घेतलं. सर्व महिलांना सुप्याजवळच्या एका मंगल कार्यालयात ठेवण्यात आलं. थोड्या वेळाने त्यांना सोडलं आणि पुण्याकडे रवाना करण्यात आलं. या आंदोलनाला शिवसेना आणि सनातनने विरोध केला होताच. भाजप नेते आणि गृहराज्यमंत्री राम शिंदेंनीही गावकर्यांच्या विरोधात न जाण्याचा मार्ग पत्करला. त्यामुळे सध्यापुरतं तरी हे आंदोलन थांबलेलं दिसतंय. पण परंपरेविरुद्ध लढणार्या रणरागिणी यापुढे काय करणार, हे पाहावं लागेल. राज्य सरकार मध्यस्थीसाठी तयार, चर्चा करुन प्रश्न सोडवणार - राम शिंदे दरम्यान, शनी शिंगणापूरच्या चौथर्यावर जाऊन दर्शन घेण्याचा वाद आज चांगलाच पेटला असताना अखेर राज्य सरकारनं मध्यस्थीची तयारी दाखवली आहे. सर्वांना विश्वासात घेवून आम्ही हा प्रश्न सोडवू असं गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी म्हटलंय. महिला ब्रिगेड, मंदिर विश्वस्त समिती आणि गावकर्यांशी चर्चा करुन प्रश्न सोडवणार असल्याचंही ते म्हणालेत.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
Follow @ibnlokmattv // <![CDATA[ !function(d,s,id){var js,fjs=d.getElementsByTagName(s)[0],p=/^http:/.test(d.location)?‘http’:‘https’;if(!d.getElementById(id)){js=d.createElement(s);js.id=id;js.src=p+’://platform.twitter.com/widgets.js’;fjs.parentNode.insertBefore(js,fjs);}}(document, ‘script’, ’twitter-wjs’); // ]]> |
---|
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++