06 मार्च : ‘मुंबईची खरी आणि सचोटीची पहारेकरी एकमेव शिवसेनाच आहे आणि हे सर्वमान्य, सर्वपक्षीय सत्य आहे. या सचोटीवर तुम्ही काय म्हणून पहारेकरी बसवणार? खरं तर मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावरच एका स्वतंत्र उपलोकायुक्तांची नेमणूक करणे गरजेचे आहे,’ अशा शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेवर उपलोकायुक्त नेमण्याच्या मुख्यमंत्री फडणवीस यांच्या घोषणेचा समाचार घेतला आहे.
मुंबईच्या महापौर आणि उपमहापौरपदाची निवडणूक भाजप लढणार नसल्याचं स्पष्ट करत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. भाजप यापुढं महापालिकेत पहारेकराच्या भूमिकेत असेल. तसंच, मुंबई महापालिकेत पारदर्शकता आणण्यासाठी उपलोकायुक्ताची नियुक्ती केली जाईल, असं त्यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या या घोषणांमुळं शिवसेना संतापली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या विधानावरुन ‘सामना’मधून उद्धव ठाकरेंनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावरच एका स्वतंत्र उपलोकायुक्ताची नेमणूक करणे गरजेचे आहे. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ बैठकीतही लोकायुक्तांना कायमची खुर्ची ठेवण्याची ‘पारदर्शकता’ आणली तरच सत्य आणि ढोंग यातला फरक लोकांना समजेल’, असा खरमरीत टोला उद्धव यांनी मुख्यमंत्र्यांना हाणला आहे.
आमचे निवडून आलेले 82 नगरसेवक पारदर्शकतेचे पहारेकरी म्हणून काम करतील. हीसुद्धा एक थापच आहे. पुन्हा मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार वगैरे रोखण्यासाठी एका खास उपलोकायुक्तांची नेमणूक केल्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली. हा पराभवानंतरचा रडीचा डाव व सत्तेचा दुरुपयोग आहे’, असा आरोपही उद्धव यांनी सामना संपादकीयमधून केला आहे.
अशा अनेक थैलीबाज लचांडांना आम्ही पुरून उरलो आहोत. त्यामुळे कोणत्याही टांगत्या तलवारीची भीती आम्हाला नाही’,असे सांगत मुंबईची पहारेकरी शिवसेनाच, असंही सामनामध्ये स्पष्ट करण्यात आलं आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज ला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv