19 फेब्रुवारी : सामनाच्या प्रकाशनावर बंदीची मागणी करणं म्हणजे छुप्या पद्धतीनं आणीबाणी लादण्याचा प्रयत्न असल्याचं दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी म्हटलं आहे. सामनाची भूमिका स्वच्छ आणि पारदर्शी आहे. मात्र ज्यांना आमची देशद्रोह्यांविरुद्धची लढाई मान्य नाही, राष्ट्रीय विचारांच्या प्रसाराचा पोटशूळ आहे अशा ढोंगी लोकांना सामनाबद्दल नेहमीच आकस राहिला आहे. त्यातूनच सामनाविरोधात तक्रार केली गेली, असंही संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या उत्तरात म्हटलं आहे.
भाजपने काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाकडे दैनिक ‘सामना’वर १६, २० आणि २१ फेब्रुवारी या दिवशी बंदी घालण्याची मागणी केली होती. भाजपच्या या मागणीनंतर ‘सामना’ला निवडणूक आयोगाकडून नोटीस पाठवण्यात आली होती. त्यावर स्पष्टीकरण आल्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल, असं राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी सांगितलं सांगितलं होतं. या प्रकरणी आज ‘सामना’कडून आपली भूमिका स्पष्ट शब्दात मांडण्यात आली.
‘सामना’ हे एक जहाल विचारसरणीचे वृत्तपत्र जरूर आहे, पण निवडणूक आयोगाने घालून दिलेली आचारसंहिता आणि निवडणूक नियमांची चौकट या विषयी ‘सामना’ आदरच करतो. त्या नियमांचं कसोशीनं पालन करण्याचा प्रयत्न आणि पत्रकारितेच्या मापदंडाचं उल्लंघन होणार नाही याची दक्षता ‘सामना’ने नेहमीच घेतली आहे, असं त्यांनी म्हटलं आहे. तसंच, अशा प्रकारची मागणी करणं हा अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर हल्ला असल्याचं संजय राऊत यांनी दिलेल्या उत्तरात म्हटलं आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेज ला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv

)







