03 जानेवारी : नरेंद्र मोदी पंतप्रधान बनले तर ते देशासाठी घातक ठरेल, असा थेट हल्ला पंतप्रधानांनी पत्रकार परिषदेत केला. पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन आपले दीर्घकाळाचे मौन सोडले आहे. पंतप्रधानांनी तब्बल तीन वर्षांनंतर ही पत्रकार परिषद घेतली. येत्या निवडणुकीत यूपीएचाचं पंतप्रधान असेल पण आपण पंतप्रधानांच्या शर्यतीत नसू, असं ते म्हणाले. त्यांच्या जागी यूपीएचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असेल हे पक्ष योग्य वेळी ठरवेल, असं ही त्यांनी सांगितलं. दिल्लीकरांनी आम आदमी पार्टीवर विश्वास ठेवला, आता या पक्षाला थोडा वेळ द्यायला हवा, असं पंतप्रधानांनी म्हटलंय. देशाची अर्थव्यवस्था लवकरच सुधारेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. अमेरिकेशी झालेला अणुकरार हा माझ्या कारकिर्दीतला सगळ्यात चांगला निर्णय होता, असंही ते म्हणाले. तब्बल तीन वर्षानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत पंतप्रधान मनमोहन सिंग काय म्हणाले :
- नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले, तर ते देशाला घातक ठरेल
- अहमदाबादच्या रस्त्यांवर कत्तल करून कुणी शक्तिशाली होत नाही
- मी येणार्या निवडणुकांपर्यंतच पंतप्रधानपदी राहीन
- मी निवडणुकीनंतर सूत्र नव्या माणसाच्या हातात सोपवीन
- राहुल गांधींमध्ये पंतप्रधान होण्याची प्रचंड क्षमता आहे
- पंतप्रधानपदाच्या उमेदवाराचा निर्णय काँग्रेस योग्य वेळी घेईल
- मला कधीही राजीनामा द्यावासा वाटला नाही
- गेल्या 9 वर्षांतला आर्थिक विकास समाधानकारक आहे
- महागाई आटोक्यात आणण्यात आम्ही कमी पडलो
- भ्रष्टाचाराचा मुकाबला करण्याबद्दल आम्ही कटिबद्ध आहोत