उत्तर प्रदेश, 09 डिसेंबर: सोनभद्र (Sonbhadra) भागात एका घटनेनं चांगलीच खळबळ उडाली आहे. एका महिलेचा सांगाडा (woman's skeleton) सापडल्यानं गाव हादरलं आहे. हा सांगाडा सोनभद्र शहरातील अनपारा पोलीस ठाण्याच्या (Anpara police station) हद्दीतील सिधवा टेकडीवर सापडला आहे. मृत महिलेची ओळख सोगिया म्हणून झाली आहे. जी बबलू याची पत्नी आहे. गेल्या महिन्याभरापासून महिला बेपत्ता होती. महिलेच्या माहेरचे लोक सतत तिचा शोध घेत पोलीस ठाण्याच्या फेऱ्या मारत होते. मात्र स्थानिक पोलीस याप्रकरणी कोणतीही ठोस कारवाई करत नव्हते. बुधवारी महिलेचा मृतदेह तिच्या कुटुंबीयांनीच शोधून काढला आणि त्यानंतर एकच खळबळ उडाली.
प्रकरण उघडकीस आल्यानंतर कुटुंबीय आणि स्थानिक ग्रामस्थ संतप्त झाले आणि त्यांनी वाराणसी-शक्तीनगर मुख्य रस्ता रोखून धरला. त्याचवेळी पोलिसांनी संतप्त ग्रामस्थांची समजूत काढत चक्का जाम पूर्ववत केला आणि महिलेचा सांगाडा ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरू केली.
दुर्गंधी आल्यानंतर स्थानिक लोकांनी खोदकाम केलं
मिळालेल्या माहितीनुसार, अनपारा पोलीस स्टेशन हद्दीतील सिधवा टेकडीवर बऱ्याच दिवसांपासून दुर्गंधी येत होती. मृत मुलाच्या सांगण्यावरून कुटुंबीय आणि स्थानिक ग्रामस्थांनी दुर्गंधीयुक्त ठिकाणी खोदकाम केलं. त्यानंतर एक सांगाडा बाहेर काढण्यात आला. हे पाहून सगळेच चक्रावून गेले. यानंतर स्थानिक लोकांनी या सांगाड्याची माहिती स्थानिक पोलिसांना दिली.
हेही वाचा- 69 ऊस कामगारांचं कोल्हापुरातून रेस्क्यू, अमानूष वागणूक देत ठेवलं होतं ओलीस
मिळालेल्या माहितीनुसार, 27 वर्षीय सोगियाचे पती बबलूसोबत महिनाभरापूर्वी भांडण झालं होतं, तेव्हापासून ती महिला बेपत्ता होती. महिलेच्या कुटुंबीयांनी पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी बेपत्ता झाल्याची नोंद केली होती. कुटुंबीय पोलिसांकडे तपासाची मागणी करत राहिले, मात्र पोलिसांनी ऐकले नाही. मृत महिलेचा मुलगाही वारंवार पोलिसांना आई वडिलांच्या भांडणाची माहिती देत होते, मात्र पोलिसांनी त्याकडे लक्ष दिले नाही.
मृताच्या मुलाने अनेकदा बोलूनही पोलिसांनी दिलं नाही लक्ष
पोलिसांनी लक्ष न दिल्यानं 5 वर्षीय मुलानं सांगितलेल्या ठिकाणी महिलेचे नातेवाईक पोहोचले. शोध सुरू केला असता उग्र वास येत होता. त्यानंतरच हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले. यानंतर स्थानिक ग्रामस्थ संतप्त झाले आणि स्थानिक ग्रामस्थांची पोलिसांशी झटापट सुरू झाली. यानंतर गावकऱ्यांनी वाराणसी-शक्तीनगर रस्ता अडवून ठेवला. अथक परिश्रमानंतर पोलिसांनी ग्रामस्थांची समजूत काढली आणि ठप्प झालेला रस्ता मोकळा केला.
महिलेच्या पाच वर्षांच्या निष्पाप मुलाने सांगितले की, माझ्या आई आणि वडिलांमध्ये भांडण झाले होते. पप्पांनी आईला मारले, त्यानंतर आई बेशुद्ध झाली. त्यानंतर वडिलांनी आईला टेकडीवर नेऊन पुरलं. पोलीस काका आले होते पण माझे कोणी ऐकले नाही.
नेहमी पती करायचा मारहाण
मृत महिलेची आई जगरतिया यांनी सांगितले की, माझी मुलगी 3 तारखेपासून बेपत्ता होती. आम्ही सातत्यानं पोलीस ठाण्याच्या फेऱ्या मारत होतो, पण कोणताही तपास होत नव्हता. आज आम्ही शोध सुरू केला तेव्हा माझ्या मुलीचा मृतदेह टेकडीवर पुरलेला आढळून आला. माझ्या मुलीचा पती तिला नेहमी मारहाण करायचा. त्याने माझ्या मुलीची हत्या करून मृतदेह पुरला आणि आज जेव्हा ही उघड झाली तेव्हा तो फरार झाला.
हेही वाचा- CDS बिपिन रावत यांचं निधन; पार्थिवासंदर्भातले अपडेट्स, असा असेल अंत्ययात्रेचा प्रवास
दुसरीकडे, एएसपी मुख्यालय विनोद कुमार यांनी या प्रकरणी सांगितले की, पोलिसांनी महिलेच्या बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या पतीच्या सांगण्यावरुन नोंदवली होती. अनपारा पोलीस मृताच्या पती बबलूचीही चौकशी करत होते. आज मृत महिलेच्या माहेरच्यांनी आपल्या मुलीचा मृतदेह टेकडीवर पुरण्यात आल्याची माहिती दिली.
पोलिसांनी टेकडीवर खोदकाम केलं असता एका महिलेचा सांगाडा सापडला. कपड्यांवरुन मृताच्या नातेवाईकांनी महिलेची ओळख पटवली आहे. कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून पतीला अटक करण्यात आली आहे. अन्य सासरचे लोक फरार आहेत. शोध सुरु आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Madhya pradesh, Uttar pradesh news