नवी दिल्ली 07 मार्च : पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकांकडे (West Bengal election 2021) सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे. भाजपही बंगालमध्ये आपली संपूर्ण ताकत पणाला लावत असल्याचं चित्र आहे. राज्यात आधीपासूनच निवडणुकीदरम्यान हिंसेची शंका वर्तवण्यात आली आहे. अशात आता काही नेते थेट मतदारांनाच धमकावत असल्याची स्थिती पाहायला मिळत आहे. तृणमूल काँग्रेसचे (TMC) नेते आणि राज्य सरकारमध्ये कृषीमंत्री असलेले तपन दासगुप्ता (Tapan Dasgupta) यांनीही असंही एक वादग्रस्त वक्तव्य करत मतदारांना थेट धमकीच दिली आहे. त्यांनी सरळ म्हटलं आहे, की आम्हाला मतदान न केल्यास वीज आणि पाण्यापासून वंचित राहावं लागेल.
माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, पश्चिम बंगालच्या सप्तग्राममधून तृणमूलचे उमेदवार असलेल्या तपन दासगुप्ता यांनी शनिवारी हुगली येथे आयोजित एका जनसभेत हे वक्तव्य केलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी म्हटलं, की ज्या भागातील लोक त्यांना मतदान करणार नाही, तिथे भविष्यात वीज आणि पाणी यांचा पुरवठा खंडित केला जाईल. इतकंच नाही तर मग मतदारांना या सुविधा घेण्यासाठी भाजपकडे जावं लागेल, असंही त्यांनी म्हटलं.
ही पहिलं वेळ नाही, की एखाद्या नेत्यानं थेट मतदारांना धमकावलं आहे. याआधीही टीएमसीचेच आमदार हमीदुल रहमान यांनीही काहीसं असंच वक्तव्य केलं होतं. मीडिया रिपोर्टनुसार, दिनाजपुरमध्ये घेतलेल्या एका सभेदरम्यान ते म्हणाले होते, की विश्वासघात करणाऱ्या लोकांकडे नंतर पाहून घेईल. जे आमच्या पक्षाला मतदान करणार नाहीत, त्यांना विश्वासघाती म्हटलं जाईल, असं विधान त्यांनी केलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Electricity cut, Mamata banerjee, TMC, Trinamool congress, West bengal