नवी दिल्ली, 14 डिसेंबर : महाराष्ट्र विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात गदारोळ आणि गोंधळ घातल्याने भाजपच्या 12 आमदारांना निलंबित (BJP 12 mla suspended) करण्यात आले होते. त्यानंतर या निलंबित आमदारांनी याच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) धाव घेतली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाकडून या निलंबित आमदारांना एक मोठा झटका बसला आहे. कारण, या सर्व आमादरांच्या निलबंनाला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती देण्यास नकार दिला आहे. याप्रकरणी आता पुढील सुनावणी जानेवारी महिन्यात होणार आहे. (SC refuses to revoke suspension of 12 mla)
राज्य विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन डिसेंबर महिन्याच्या अखेरीस होत आहे. आता सर्वोच्च न्यायालयाने निलंबनाला स्थगिती देण्यास नकार दिला आहे त्यामुळे या आमदारांना आता हिवाळी अधिवेशनात सहभागी होता येणार नाहीये. या प्रकरणी पुढील सुनावणी 11 जानेवारी रोजी होणार आहे.
वाचा : राहुल गांधींच्या सभेसाठीची याचिका काँग्रेसकडून सुनावणीपूर्वीच मागे
नेमकं काय घडलं होतं?
पावसाळी अधिवेशनात राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ यांनी ओबीसी आरक्षणाबाबतचा ठराव मांडला. पण, बोलू दिलं नाही म्हणून भाजपच्या आमदारांनी जोरदार गोंधळ घातला. एवढंच नाहीतर सभापती भास्कर जाधव यांच्या दालनाबाहेर जोरदार घोषणाबाजी करत त्यांना धक्काबुक्की सुद्धा केल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार, अनिल परब यांची बैठक पार पडली. सभागृहातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. त्यामुळे भाजपचे डझनभर आमदार निलंबित करण्याचा निर्णय घेतला होता.
संसदीय मंत्री अनिल परब यांनी प्रस्ताव मांडला आणि 12 आमदार निलंबित करण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्यानंतर या 12 आमदारांचे निलंबन करण्यात आले. या सर्व आमदारांना एका वर्षासाठी निलंबित करण्यात आले आहे.
१) गिरिश महाजन
२) संजय कुटे
३) अभिमन्यु पवार
४) आशिष शेलार
५) पराग आळवणी
६) योगेश सागर
७) राम सातपुते
८) नारायण कुचे
९) अतुल भातखळकर
१०) बंटी भागडिया
११) हरिष पिंपळे
१२) जयकुमार रावल
सभागृहात घडलेल्या या प्रकारावर भास्कर जाधव यांनी म्हटलं होतं, मी गेल्या 36 वर्षांपासून सभागृहाचं काम पाहतोय. अजितदादा, बाळासाहेब थोरात यांनी 1985 पासून सभागृहाचे कामकाज पाहिले आहे. मी आक्रमक आहे हे मान्य करतो, पण मी दिलेली वेळ कधी मागेपुढे केली नाही. भाजपच्या आमदारांनी माझ्यासमोरील माईक पळवून नेण्याचा प्रयत्न केला. राजदंड पळवून नेण्याचा प्रयत्न केला. मी त्यांना नियम करण्याचा इशारा दिला. सभागृहात वाद होता, एकमेकांवर धावून जातात. पण जेव्हा सभापतींनी कामकाज तहकूब केले तर वाद तिथेच थांबत असतो.
सभागृहात वाद झाला असला तरी बाहेर गेल्यावर आपण राजकीय व्यक्ती आहोत. ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे. मी दालनात गेलो तेव्हा उपसभापतींनी मला बसण्याचे सांगितले. पण मी बसलो नाही. मी काही इथं कायमचा सभापती नाही. तितक्याच रागाच्या भरात फडणवीस आले. त्यांचा राग असणे स्वभावाविक होते, त्यांना बोलू दिले नाही. तिथे चंद्रकांत पाटील आले त्यांना मी बसण्यास सांगितले. सभागृहात अनेक वादाचे प्रसंग येतात, मी तुम्हाला पुन्हा बोलायला देईल. पण त्यावेळी फडणवीस आणि त्यांचे सदस्य शांत होण्याच्या परिस्थितीत नव्हते. इतर सदस्यांनी मला आई-बहिणीवरून शिवीगाळ केली. राडेबाज करणाऱ्या गुंडाप्रमाणे ते धावून आले असंही भास्कर जाधव म्हणाले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, महाराष्ट्र