नवी दिल्ली, 18 मे : माजी पंतप्रधान राजीव गांधी (Former PM Rajiv Gandhi) यांच्या हत्या प्रकरणातील दोषी एजी पेरारिवलन (A G Perarivalan) याला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्याच्या सुटकेचे आदेश दिले आहेत. आरोपी एजी पेरारिवलन हा मागील 31 वर्षांपासून तुरुंगात कैद आहे. पेरारिवलन याने त्याच्या सुटकेला होत असलेल्या विलंबाबाबत सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court of India) अर्ज केला होता. खंडपीठाने काय म्हटले? 2018 मध्ये तामिळनाडू सरकारने त्याची सुटका करण्याची शिफारस केली होती. यानंतर हे प्रकरण कायद्याच्या कचाट्यात अडकले होते. न्यायमूर्ती एल नागेश्वर राव आणि बीआर गवई यांच्या खंडपीठाने सांगितले की, तामिळनाडू राज्य मंत्रिमंडळाने आपल्या विचारांनी पेरारिवलन याला सूट देण्याचा निर्णय घेतला. खंडपीठाने पुढे म्हटले आहे की, तामिळनाडूच्या राज्यपालांनी घटनेच्या कलम 161 नुसार त्याच्या अधिकारांचा वापर करण्यात कोणताही विलंब न्यायालयीन पुनरावलोकनाच्या अधीन असू शकतो. राजीव गांधी याची हत्या तामिळनाडू राज्यातील श्रीपेरंबुदूर येथे 21 मे 1991 रोजी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची एक जनसभेदरम्यान, हत्या करण्यात आली होती. यानंतर 11 जून 1991 रोजी पेरारिवलन याला अटक करण्यात आली होती. पेरारिवलन याला टाडा न्यायालयाने 1998 मध्ये फाशीची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेला नंतर सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. तरीही 1999 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने शिक्षा कायम ठेवण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्यानंतर 2014 साली त्याला देण्यात आलेली फाशीची शिक्षा ही जन्मठेपेत बदलण्यात आली. यानंतर यावर्षी मार्चमध्ये सर्वोच्च न्यायालयाने पेरारिवलन याला जामीन मंजूर केला. हेही वाचा - OBC आरक्षण निवडणूक प्रकरण: BJP चा मोठा विजय, सर्वोच्च न्यायालयानं दिले नवे आदेश
मात्र, केंद्र सरकारने त्याच्या याचिकेला विरोध केला. तसेच तमिळनाडूच्या राज्यपालांनी हे प्रकरण राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे पाठवले आहे. त्यांनी अद्याप यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही. पेरारिवलन याच्या सुटकेनंतर आता इतर दोषी नलिनी मरुगन, एक श्रीलंकन नागरिक यांच्या सुटकेच्या आशाही जागल्या आहेत.