नवी दिल्ली, 26 सप्टेंबर: मागील जवळपास दीड वर्षांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन (farmer protest) करत आहे. केंद्र सरकारने पारीत केलेल्या नवीन तीन कृषी कायद्याच्या (Three new agricultural act) विरोधात लढा सुरू ठेवण्यासाठी संयुक्त किसान मोर्चाने (Sanyukta Kisan Morcha) सोमवारी ‘भारत बंद’ची (Bharat Bandh) घोषणा केली आहे. भारत बंदच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांकडून (Delhi Police) दिल्लीच्या सीमेवर सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. तर शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या 40 शेतकरी संघटनांच्या संयुक्त किसान मोर्चाने लोकांना भारत बंदमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे. दुसरीकडे, दिल्ली सरकारने भारत बंदला पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. याबाबत माहिती देताना शनिवारी एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, भारत बंदच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय राजधानीत सोमवारी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. तसेच दिल्ली शहराच्या सीमेवर तीन ठिकाणी आंदोलन करणाऱ्या कोणत्याही शेतकऱ्याला दिल्लीत प्रवेश दिला जाणार नाही. दुसऱ्या एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं की, दिल्लीत भारत बंदची हाक नाही, पण आम्ही सध्याच्या घडामोडी पाहता, सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून आम्ही सुरक्षा दले तैनात केले आहेत. संयुक्त किसान मोर्चाने केलं आवाहन लोकशाही आणि संघराज्य तत्त्वांचे रक्षण करण्यासाठी राजकीय पक्षांनी देखील भारत बंदमध्ये सहभागी व्हावे असं आवाहन संयुक्त किसान मोर्चाने केलं आहे. संयुक्त किसान मोर्चाने सांगितलं की, सोमवारी (27 सप्टेंबर) सकाळी 6 ते दुपारी 4 या वेळेत भारत बंदचं आयोजन करण्यात आलं आहे. हेही वाचा- गुलाब चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात, राज्यात 3 ते 4 दिवस पावसाचा इशारा दुसरीकडे, दिल्लीतील आम आदमी पक्षाने संयुक्त किसान मोर्चाच्या भारत बंदला पाठिंबा जाहीर केला आहे. शेतकऱ्यांच्या भारत बंदला पाठिंबा देणार असल्याचं आम आदमी पार्टीने आपल्या निवेदनात म्हटलं आहे. सत्ताधारी भाजप हा अन्नदात्याचा आवाज दाबण्यासाठी हुकूमशाहीचा अवलंब करत आहे. भाजपला याची किंमत मोजावी लागेल, असंही आपने आपल्या निवेदनात म्हटलं आहे. हेही वाचा- पंतप्रधान मोदींच्या अमेरिकेतील 3 दिवसीय ऐतिहासिक दौऱ्यात नेमकं काय झालं? संयुक्त किसान मोर्चाच्या भारत बंदच्या घोषणेमुळे सोमवारी सर्व सरकारी आणि खाजगी कार्यालये, शैक्षणिक आणि इतर संस्था, दुकाने, उद्योग आणि व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद राहणार आहेत. पण सर्व आपत्कालीन सेवा, रुग्णालये, औषधाची दुकानं, मदत आणि बचाव कार्य आणि वैयक्तिक आपत्कालीन परिस्थिती असलेल्या लोकांना बंदमधून वगळण्यात आलं असल्याचं संयुक्त किसान मोर्चाकडून सांगण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.