जयपूर 24 जुलै: राजस्थानमधल्या राजकीय नाट्याने (Rajasthan Political Crisis) आता गंभीर वळण घेतलं आहे. कुठल्याही परिस्थितीत सरकार वाचवायचच हा निश्चय करत मुख्यमंत्री अशोक गेहलोत (CM Ashok Gehlot) कामाला लागले आहेत. राज्यपालांनी तातडीने अधिवेशन बोलवावं अशी मागणी मुख्यमंत्री गेहलोत यांनी केली आहे. यासाठी ते सर्व आमदारांसह राजभवनावर गेलेत. आमदारांनी भरलेली बस आणि इतर नेत्यांच्या गाड्यांचा ताफा दुपारी राजभवनावर धडला. राज्यपालांनी अधिवेशन बालविण्याची मागणी मान्य केली नाही तर धरणं धरणार असल्याचा इशारा मुख्यमंत्री गेहलोत यांनी दिला आहे. आमदारांची ओळख परेड करण्यासाठी मुख्यमंत्री गेहलोत हे राजभवनावर गेल्याने राजस्थानात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलं आहे. राज्यपाल कलराज मिश्र यांची भेट घेऊन त्यांनी सोमवारी अधिवेशन बोलविण्याची मागणी केली. तर हाय कोर्टाने सचिन पायलट यांच्यावर कारवाई करण्यास मनाई केली आहे. जैसे थे स्थिती ठेवा असा आदेश कोर्टाने दिला आहे. आपल्याला 103 आमदारांचं समर्थन आहे असा दावा मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी यांनी केलाय. यात कांग्रेसच्या 88, बीटीपी 02, सीपीएम 02, आरएलडी 1 आणि 10 अपक्ष आमदारांचा समावेश आहे. राजभवनावर गेलेल्या आमदारांनी भवनातल्या हिरवळीवरच बैठक मारली आणि घोषणाबाजीला सुरुवात केली. सरकारवर आमदारांचा विश्वास असून सोमवारी त्याचा सोक्ष मोक्ष लावा अशी मागणी त्यांनी केली आहे. राज्यपाल काँग्रेसच्या मागणीकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. मनधरणीच्या मोठ्या प्रयत्नानंतरही पायलट यांची नाराजी दूर झाली नाही. त्यानंतर अखेर काँग्रेसने त्यांची उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी केली होती. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनीही पायलट यांच्या चर्चा केली होती. मात्र त्यांचं समाधान झालं नाही. या संभाषणानंतर 3 तासात सचिन पायलट यांची हकालपट्टी करण्यात आली होती.
#WATCH Rajasthan: Congress MLAs supporting Chief Minister Ashok Gehlot sit and raise slogans at Raj Bhawan.
— ANI (@ANI) July 24, 2020
The Chief Minister had met Governor Kalraj Mishra this afternoon over the issue of the convening of the Assembly Session. pic.twitter.com/m6XhwwMuM2
काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी सचिन पायलट यांना फोन करून समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तसंच काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांच्यासोबत भेट घालून देण्याची ऑफर दिली. मात्र सचिन पायलट यांनी ही ऑफर धुडकावबन लावली होती. त्यामुळे पुढच्या काही दिवसात राज्यातल्या काँग्रेस सरकारचं भवितव्य निश्चित होणार आहे.