नवी दिल्ली, 15 मार्च : 'त्या मुका घ्या, मुका प्रकरणात शिवसेना कार्यकर्त्यांना अटक का केली जात आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा काय संबंध आहे. आम्ही सांगितलं होतं का, जाहीर कार्यक्रमात मुका घ्यायला, मुळात या प्रकरणात आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मुलाला अटक का नाही, असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थितीत केला.
खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. याावेळी त्यांनी शितल म्हात्रे प्रकरणावर भाष्य केलं.
आता मुंबईत मुका घ्या मुका प्रकरण चालू आहे, आज दादा कोंडके हवे होते. त्यांचा मुका घ्या मुका सिनेमा गाजला होता. मुका घ्या, मुका प्रकरणात शिवसेना कार्यकर्त्यांना अटक का केली जात आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा काय संबंध आहे. आम्ही सांगितलं होतं का, जाहीर कार्यक्रमात मुका घ्यायला. मुळात तो व्हिडीओ खरा की खोटा समोर येऊ द्या. मी तो व्हिडीओ पाहिला नाही, असंख्य कार्यकर्ते हेच सांगत आहे, आमच्या घरावर पोलिसांची धाड पडली. मुळात प्रकाश सुर्वे यांच्या मुलानेच तो व्हिडीओ व्हायरल केला आहे. त्याला अटक का नाही, पहिले गुन्हेगार सुर्वे आहेत, असा आरोपही राऊतांनी केला.
गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे परिवार, सहकारी यांचे बाबतीत खोटे गुन्हे दाखल करणे, संपत्तीचा विषय असेल किंवा एकदा व्हिडिओ मॉर्फिंगचा विषय असेल फक्त शिवसेना आणि ठाकरे परिवार यांना लक्ष करून राजकारण सुरू आहे. आजही आम्ही सांगतो या न्यायालयातला न्याय मिळाला नाही, आम्हाला अजूनही आशा आहे. ठाकरे सरकारला बदनाम करण्याचा डाव आहे, असा आरोपही राऊतांनी केला.
खरंतर राज्यात खोके वाल्यांच्या संपत्तीचा हिशेब मागायला हवा पण ते आमच्या संपत्तीचा हिशेब मागत आहेत फक्त विरोधी पक्षाच्या नेत्यांना टार्गेट केलं जातं आहे, तुम्ही कायदेशीर किंवा बेकायदेशीर हल्ले करा, आम्ही तुमचा प्रत्येक हल्ला परतवून लावू, असंही राऊत म्हणाले.
या देशामध्ये विरोधी पक्षांच्या नेत्यांना टार्गेट केलं जात आहे. ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून टार्गेट केलं जात आहे. सत्ताधारी पक्षाचे नेते हे जणून दुधाने अंघोळ करत आहे. आसामच्या मुख्यमंत्र्यांबद्दल सीबीआय आणि ईडी कारवाई का करत नाही. नारायण राणे यांच्यासंदर्भात भाजपची काय भूमिका होती. हे सगळं पुढे असताना फक्त भाजपच्या वाशिंग मशिनमध्ये गेल्यामुळे त्यांना अभय आहे, नारायण राणे हे तुरूंगात असेल पाहिजे, अशी भूमिका भाजपची होती, अशी टीकाही राऊतांनी केली.
महाराष्ट्रामध्ये मी, अनिल देशमुख, नितीन देशमुख, नवाब मलिक किंवा सदानंद कदम असतील प्रत्येकावर राजकीय सूड भावनेतून कारवाई सुरू आहे. भीमा साखर कारखान्याचे प्रकरण पुराव्यासह दिलं आहे. मग तुमचे किरीट सोमय्या सारखे भंकप लोक कुठल्या आधारावर पुरावे करत आहे. क्राऊड फंडिंग प्रकरणात साकेत गोखले हे जेलमध्ये असेल तर आयएनएस विक्रांत प्रकरणात किरीट सोमय्यांना क्लिन चिट कशी मिळाली, असा सवालही राऊतांनी उपस्थितीत केला.
'बाळासाहेब ठाकरे शक्तिशाली नेते होते आणि त्यांचे नातू आदित्य ठाकरे यांचा समावेश वर्ड इकॉनॉमिक फोरममध्ये झाला आहे. त्यांच समावेश होणे हे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या दृष्टीने गौरव आहे. महाराष्ट्राच्या तर आहे आणि देशासाठी आहे. आपल्या देशाला ऑस्कर मिळाला आणि आदित्य ठाकरे यांची 100 शक्तिशाली तरूण नेतृत्वामध्ये समावेश झाला आहे. गेल्या काही वर्षांपासून आदित्य ठाकरे हे एक मंत्री, नेता म्हणून जागतिक पातळीवर ठसा उमटवत आहेत, आदित्य हे एक राजकीय भविष्य आहे. त्यांच्या नेतृत्वाला मान्यता दिली आहे, असं म्हणत संजय राऊत आदित्य ठाकरेंचं कौतुक केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.