मुंबई, 20 जुलै: कोरोनामुळे सर्वच सणांवर निर्बंध आले असून सलग दुसऱ्या वर्षी पंढरीची वारी (Pandharpur Wari) रद्द झाल्याने भक्तांना विठूमाऊलीच्या दर्शनाला जाता आले नाही. मात्र भक्त आपापल्या परीने विठुरायाची भक्ती करून घरूनच दर्शन घेत आहेत. पहाटे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि रश्मी ठाकरे यांच्या हस्ते श्री. विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापुजा करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीही ट्विट करुन आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, “आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी माझ्या सर्वांना शुभेच्छा. सर्वांना उदंड आनंद आणि चांगले आरोग्य लाभू दे अशी विठ्ठल चरणी प्रार्थना करूया. वारकरी चळवळ ही आपल्या उत्कृष्ट परंपरेचं उदाहरण असून समानता आणि एकता यावर भर देणारी आहे.”
आषाढी एकादशीच्या पवित्र दिवशी माझ्या सर्वांना शुभेच्छा. सर्वांना उदंड आनंद आणि चांगले आरोग्य लाभू दे अशी विठ्ठल चरणी प्रार्थना करूया.
— Narendra Modi (@narendramodi) July 20, 2021
वारकरी चळवळ ही आपल्या उत्कृष्ट परंपरेचं उदाहरण असून समानता आणि एकता यावर भर देणारी आहे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे पांडुरंगाच्या चरणी साकडे पंढरपुरात पुन्हा एकदा भक्तीसागर भरु दे. भक्तीरसात, टाळ-मृदंगाच्या गजरात तुझ्या ओढीची पायी वारी पुन्हा एकदा सुरु होऊ दे. यासाठी देवा आता कोरोनाचे संकट नष्ट होऊ दे. माझ्या महाराष्ट्राला आरोग्य संपन्नता लाभू दे, असे साकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज आषाढी एकादशीच्या महापुजेच्यावेळी पांडुरंगाच्या चरणी घातले. आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व सौ. रश्मी ठाकरे यांच्या हस्ते श्री. विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापुजा करण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, पुन्हा एकदा सर्वांना आनंदी आणि निरोगी आयुष्य जगू दे. कोरोनाच्या काळात नागरिकांच्यावतीने पाळण्यात येणारे सामाजिक मिटवू दे, वारकऱ्यांनी तुडूंब,आनंददायी, भगव्या पताक्यांनी भरलेलं पंढरपूर पहावयाचे आहे. आज मंदिरात मी वृक्षारोपण केले. हा परंपरेचा वृक्ष असून याची पाळेमुळे जगभरात आणखी घट्ट होतील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.