आनंद: गुजरातमधील आनंद जिल्ह्यात तारापूरजवळ एका ट्रकनं इको कारला भीषण धडक दिली आहे. या अपघातात नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. यामध्ये दोन मुलांचाही समावेश आहे. सर्व मृतक एकाच परिवारातील असून ते इको कारने भावनगरवरून सुरतकडे जात असल्याची माहिती मिळाली आहे. मृत नऊ जणांमध्ये पाच पुरुष, दोन महिला आणि दोन मुलांचा समावेश आहे. मृत कुटुंब भावनगर येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तारापूरजवळील इंद्रनाज गावाजवळ हा अपघात झाला आहे. समोरून सुसाट वेगानं येणाऱ्या ट्रकनं इको कारला धडक दिली. हा अपघात इतका गंभीर होता की नऊ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तारापूर चौकापासून सहा किलोमीटर अंतरावर ही घटना घडली. हा ट्रक सुरतकडून मोरबीकडे जात होता.
तर अपघातग्रस्त इको कार तारापूरवरून वटमनकडे जात होती. या अपघातात कारमधील सर्व प्रवासी ठार झाले. ही टक्कर इतकी भीषण होती की इको कारचा पूर्णपणे चुराडा झाला आहे.
ट्रकची धडक बसल्यानंतर इको कारमधील सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला. इको कारमधील सर्व लोकांचे मृतदेह एकामागून बाहेर काढण्यात आले.
अपघातास कारणीभूत असणारा हा ट्रक मध्य प्रदेशातील आहे. तर संबंधित इको कारची प्रवासी कार म्हणून नोंद आहे.
संबंधित ट्रकचा क्रमांक MP 09 HF9642 आहे. तर इको कारची नोंद जामनगर आरटीओमध्ये आहे. GJ10 TV 0409 असा कारचा क्रमांक आहे.