नवी दिल्ली 28 जानेवारी : प्रजासत्ताक दिनाला दिल्लीत ट्रॅक्टर रॅलीदरम्यान (tractor rally) झालेल्या हिंसेमुळे लोकांमध्ये नाराजी आहे. वातावरण इतकं तापलं आहे, की आंदोलनस्थळाकडे लोक रवाना झाले आहेत. लोक हे आंदोलन थांबवण्याची मागणी करत आहेत. गुरुवारी स्थानिक लोकांनी सिंघू बॉर्डवर (Singhu Border) जात आंदोलनाला विरोध केला. नाराज नागरिकांचं असं म्हणणं आहे, की आंदोलकांनी तिरंग्याचा अपमान केला आहे. सिंघू बॉर्डरवर पोहोचलेल्या नरेला परिसरातील स्थानिक नागरिक म्हणाले, की हिंदुस्तान आता तिरंग्याचा अपमान सहन करणार नाही. याशिवाय या आंदोलकांनी शेतकऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजीही केली. त्यांची मागणी आहे, की शेतकऱ्यांनी हे आंदोलन मागे घ्यावं. जवळपास गेल्या 2 महिन्यांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर केंद्र सरकारच्या 3 कृषी कायद्यांविरोधात (New Farm Laws) आंदोलक करत आहेत. दिल्लीच्या सिंघू बॉर्डरशिवाय राजस्थानच्या शाहजहांपुरमध्येही शेतकऱ्यांच्याविरोधात घोषणाबाजी सुरू झाली आहे. राकेश टिकैत यांना नोटीस या हिंसेंनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी (Amit Shah) दिल्ली पोलिसांना आरोपींवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते. याच पार्श्वभूमीवर गुरूवारी पोलिसांनी भारतीय किसान युनियनचे (BKU) प्रवक्ता राकेश टिकैत यांच्या गाझीपूरमधील तंबूच्या बाहेर नोटीस लावली आहे. या नोटीसच्या माध्यमातून दिल्ली पोलिसांना हिंसेत सामील असणाऱ्या लोकांची नावं मागितली आहेत. (हे वाचा- Republic Day violence: लाल किल्ल्यावर आंदोलनाचा झेंडा फडकावणारा तरुण नेमका कोण? ) एएनआय या वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, नोटीसमध्ये असं म्हटलं गेलं आहे, की तुम्हालाही तुमच्या संघटनेशी संबंध असलेल्या आणि या हिंसेत सामील असलेल्या लोकांची नावं देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यावर उत्तर देण्यासाठी टिकैत यांना 3 दिवसांचा वेळ दिला गेला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शेतकरी नेत्यांसह हिंसेतील आरोपींचे पासपोर्ट जमा करण्याची मागणीही होऊ शकते. तर, दुसरीकडे शेतकऱ्यांनी टिकरी बॉर्डरवर सरकारविरोधातील आपलं आंदोलन कायम ठेवलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.