नवी दिल्ली, 29 मे: देशात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेनं (Corona virus 2nd wave) शिरकाव केल्यापासून रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा पडला होता. बहुतांशी राज्यांत रेमडेसिवीर इंजेक्शनचा (Remdesivir injection) मोठ्या प्रमाणात काळाबाजार करण्यात आला. एवढंच नव्हे तर पोलिसांनी अनेक ठिकाणी छापे टाकून बनावट रेमडेसिवीर इंजेक्शनही जप्त केले होते. देशात रेमडेसिवीर इंजेक्शनचे उत्पादन कमी होतं असल्यानं या इंजेक्शनचा पुरवठा केंद्र सरकारकडून राज्यांना केला जात होता. पण आता राज्य सरकारांनी आपल्या गरजेनुसार रेमडेसिवीर इंजेक्शन थेट कंपनीकडून खरेदी करावीत, अशी घोषणा केंद्र सरकारकडून करण्यात आली आहे. रसायन आणि खते राज्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी शनिवारी जाहीर केलं की, केंद्र सरकारडून राज्यांना वितरीत केल्या जाणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण नॅशनल फार्मास्युटिकल्स प्राइसिंग एजन्सी आणि सीडीएससीओला देशातील रेमडेसिवीर इंजेक्शनच्या उपलब्धतेवर सतत लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असंही ते म्हणाले. देशात रेमडेसिवीरचं उत्पादन वाढलं केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार, देशात आता रेमडेसिवीर इंजेक्शनचं उत्पादन घेणाऱ्या केंद्रात वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी देशात केवळ 20 ठिकाणी रेमडेसिवीर इंजेक्शनचं उत्पादन घेतलं जात होतं. पण आता देशाची गरज लक्षात घेऊन एकूण 60 ठिकाणी उत्पादन घेतलं जात आहे. त्यामुळे आता मागणीपेक्षा पुरवठा अधिक असल्याचं सरकारने म्हटलं आहे.
I am delighted and satisfied to inform you all that the Production of Remdesivir is ramped up ten times from
— Dr Mansukh Mandaviya (@mansukhmandviya) May 29, 2021
just ~33,000 vials/day on 11th April 2021 to ~3,50,000 vials/day today under the astute leadership of Hon'ble PM Shri @narendramodi Ji. (1/3) pic.twitter.com/Vy2RzrsYMQ
हे वाचा- कोरोनानं पत्नीचं निधन तरीही करत होता इंजेक्शनचा काळाबाजार सोशल मीडियावर याबाबतची घोषणा करताना मंडाविया यांनी लिहिलं की, ‘आपणा सर्वांना कळवण्यात आनंद आणि समाधान होतं आहे की, देशात रेमडेसिवीरचं उत्पादन दहापट वाढण्यात आलं आहे. 11 एप्रिल 2021 रोजी दररोज देशात 33,000 इंजेक्शनच्या कुपी तयार केल्या जात होत्या. पण आता देशात दररोज साडेतीन लाख कुप्या तयार केल्या जात आहेत.