नवी दिल्ली, 24 जून : कोरोनातून (Corona) बरे झालेल्या व्यक्तींना लसीचा दुसरा डोस (Second Dose) घेण्याची गरजच नसल्याचं ICMR (Indian Council of Medical Research) च्या नव्या संशोधनातून (Research) सिद्ध झालं आहे. ICMR Northeast आणि आसाम मेडिकल कॉलेजj (Assam Medical Collage) यांनी एकत्रितरित्या केलेल्या संशोधनातून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. कोरोना न झालेल्या व्यक्तींना दोन डोस घेण्याची गरज आहे. मात्र कोरोना होऊन गेलेल्या व्यक्तींच्या शरीरात अगोदरच अँटिबॉडिज (Antibodies) तयार झालेल्या असतात. पहिल्या डोसनंतर या अँटिबॉडिजमध्ये वाढ होऊन मुबलक प्रमाणात रोगप्रतिकारक शक्ती तयार होते, असं या संशोधकांनी जाहीर केलं आहे.
असा केला प्रयोग
18 ते 75 वयोगटातील 121 नागरिकांच्या अँटिबॉडिज टेस्टचा अभ्यास करून हा निष्कर्ष काढण्यात आला. कोरोना झालेले आणि न झालेले असे दोन्ही प्रकारचे नागरिक यात होते. लस घेण्यापूर्वी, पहिला डोस घेतल्यानंतर 25 ते 35 दिवसांनी आणि मग दुसऱ्या डोसनंतर 25 ते 35 दिवसांनी त्यांची अँटिबॉडी टेस्ट करण्यात आली. ज्यांना पहिला डोस घेण्याअगोदर कोरोनाची लागण होऊन गेली होती, त्यांची रोगप्रतिकारक क्षमता पहिल्या डोसनंतरच वाढत असल्याचं लक्षात आलं. शिवाय, कोरोना होऊन गेलेल्या व्यक्तींमधील अँटिबॉडिजच्या संख्येत दुसऱ्या डोसनंतर विशेष फरक पडत नसल्याचंही दिसून आलं.
हे वाचा - Explainer: कोरोनाविरुद्धची प्रतिकारशक्ती आपल्यात आहे का हे कसं समजतं?
लसीकरणाच्या धोरणासाठी निष्कर्षांचा उपयोग?
देशात अद्यापही लोकसंख्येच्या तुलनेत पुरेशा लशी उपलब्ध नाहीत. त्यामुळे ज्यांना कोरोनाची लागण होऊन गेली आहे, त्यांना केवळ एकच डोस देण्याबाबतचं धोरण निश्चित करण्यासाठी या निष्कर्षांचा उपयोग होऊ शकतो, अशी चर्चा आहे. त्याचप्रमाणं कोरोनाचं आक्रमण न झालेल्या नागरिकांना लसीकरणासाठी अग्रक्रम देण्याचं सरकारचं धोरण आहे.
गुरुवारी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार देशानं 30 कोटी लसीकरणाचा महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. आतापर्यंत 30 कोटी 16 लाख 26 हजार 28 जणांना लस देण्यात आली आहे. त्यापैकी 5 कोटी 34 लाख 1 हजार 103 जणांना दोन्ही डोस देण्यात आले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona vaccination, Coronavirus