नवी दिल्ली, 9 एप्रिल : कोरोना व्हायरसचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊनचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला. या निर्णयानंतर युद्धकाळातही न थांबणाऱ्या भारतीय रेल्वेसेवेला ब्रेक लागला. अनेक राज्यातील मजूर दुसऱ्या राज्यात अडकून पडले. तीन आठवड्यांसाठी जाहीर करण्यात आलेल्या या लॉकडाऊनचा कालावधी 14 एप्रिलला संपणार आहे. अनेकजण आपल्या घरी जाण्यासाठी रेल्वेसेवा सुरू होण्याची वाट पाहात आहेत. मात्र लॉकडाऊनचा कालावधी वाढण्याची शक्यता आहे.
'14 एप्रिलला लॉकडाऊनचा कालावधी संपल्यानंतर केंद्र सरकार लगेच संपूर्ण रेल्वेसेवा सुरू करण्याच्या विचारत नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. 'ट्रेन सुरू करताना लिमिटेड सेवा सुरू करावी. स्पेशल ट्रेन तसेच कमी अंतराच्या सुरू कराव्यात. ट्रेनमध्ये जाण्यापूर्वी सर्वप्रथम पॅसेंजरची पूर्ण तपासणी केली जावी. काही निवडक स्थानकांवर चालणारी ट्रेन सुरू करण्यात यावी,' असा विचार सरकारी पातळीवर सुरू असल्याची माहिती आहे.
'कोरोना केसेस जास्त आहे तिथे ट्रेन चालू करू नये. ट्रेन चालवण्याच्या तारीख अजूनही निर्णय नाही. येत्या 12 एप्रिलनंतर निर्णय घ्यावा. राज्य सरकारसोबत सल्लामसलतीनंतर तसेच रेल्वे बोर्डाच्या सूचनांच्या आधारावर केंद्रांकडून निर्णय घेण्यात येईल,' अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे 14 एप्रिलनंतर रेल्वेसेवा पूर्णपणे कधी सुरू होणार, याबाबत अजूनही प्रश्नचिन्ह आहे.
'लॉकडाऊन वाढवावाच लागेल'
देशभरात कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यापार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन केले होते. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी महत्वपूर्ण संकेत दिले.
कोरोनाव्हायरसच्या (Covid -19) प्रकरणात वाढ होत असताना सर्व भागांतून 14 एप्रिल रोजी लॉकडाऊन उठवणे शक्य होणार नाही. सर्व पक्षांच्या नेत्यांसमवेत झालेल्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, 'ते राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी सल्लामसलत करतील पण लॉकडाऊन लवकरच संपेल अशी शक्यता दिसत नाही. सध्याची परिस्थिती पाहता लॉकडाऊन वाढवावाच लागेल.'
संपादन - अक्षय शितोळे