दिल्ली, 21 फेब्रुवारी : लोकसभा निवडणुकीसाठी आता राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरूवात केली आहे. कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी, रणनीती आखण्यावर सध्या भर दिला जात आहे.पण, प्रतिक्षा आहे ती निवडणूक आयोगाच्या घोषणेची. मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये लोकसभा निवडणुकांची घोषणा होऊ शकते. शिवाय, लोकसभेच्या निवडणुका या 10 टप्प्यांमध्ये होऊ शकतात अशी माहिती सूत्रांनी 'न्यूज18 लोकमत'ला दिली आहे.
निवडणुका होणार रंगतदार
यंदा होणारी निवडणूक ही अधिक रंगतदार होणार आहे. कारण भाजपचा पराभव करण्यासाठी सध्या विरोधकांनी एकत्र येत महाआघाडीची स्थापना केली आहे. देशातील प्रमुख नेते आणि समविचारी पक्षांना एकत्र घेत काँग्रेसनं विरोधकांच्या एकीची किमया साधली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हुकुमशाही करत असल्याचा आरोप करत विरोधकांनी मोदींना लक्ष्य केलं आहे. शिवाय, 2014 साली भाजपनं दिलेली आश्वासनं ही फोल ठरल्याचा आरोप देखील विरोधकांनी केला आहे.
लोकसभा निवडणुकांसाठी भाजप मित्रपक्षांची नाराजी दूर करण्यात यशस्वी झालं आहे. सध्याच्या घडीला एनडीएमध्ये 2014पेक्षा देखील जास्त मित्रपक्ष सामील झाले आहेत. महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि तामिळनाडूमध्ये AIADMKनं भाजपसोबत युती केली आहे.
प्रचाराच्या दृष्टीनं देखील भाजपनं रणनिती आखली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच एनडीएचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असणार आहेत. तर, विरोधकांनी मात्र पंतप्रधानपदाच्या उमेदवाराची घोषणा केलेली नाही. काँग्रेसनं प्रियांका गांधी - वाड्रा यांना सक्रिय राजकारणात आणून 'मास्टर स्ट्रोक' खेळला असल्याचं राजकीय निरीक्षकांनी म्हटलं आहे.
तरूणांचा कौल कुणाला?
दरम्यान, यंदा 13 कोटी तरूण पहिल्यांदा मतदान करणार आहेत.त्यामुळे त्यांचं मत कुणाला जाणार हे देखील महत्त्वाचं असणार आहे. नोकरी देणाऱ्या राजकीय पक्षाला मतदान करणार असल्याचं या तरूणांनी 'फर्स्ट पोस्ट'नं केलेल्या सर्व्हेमधून स्पष्ट झाले आहे. शिवाय, महिलांनी देखील महिला सुरक्षेचा मुद्दा महत्त्वाचं असल्याचं म्हटलं आहे. या साऱ्या गोष्टी पाहता प्रचारातील मुद्दे देखील महत्त्वाचे ठरणार आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Lok sabha election 2019, NDA, UPA