तामिळनाडू, 19 जानेवारी : एका दलित जोडप्याला आंतरजातीय विवाह केल्याबद्दल खाप पंचायतीनं तब्बल अडीच लाखांचा दंड ठोठावला असून, त्यांना मंदिरात प्रवेशही नाकारला आहे. खाप पंचायतीच्या या निर्णयाविरुद्ध या जोडप्यानं पोलिसात तक्रार केली आहे. या जोडप्याला वाळित टाकण्याचा प्रयत्नही झाला. गावात यायचं असेल तर दंड भरा, असा दबाव त्यांच्यावर टाकण्यात आल्याची तक्रार आहे.
तामिळनाडूमधील थिरूपाथुर गावातील खाप पंचायतीनं हा विचित्र निर्णय दिला. कनगराज आणि जयाप्रिया अशी यांची नावं असून, ते दोघेही एकाच अनुसूचित जातीतील आहेत; मात्र त्यांच्या उपजाती वेगळ्या आहेत. कनगराज हे मूरचा परयार समाजातील, तर जयप्रिया या थामना परया समाजातील आहेत. जयाप्रियाच्या पालकांनी विरोध केल्यामुळं या दोघांनी जानेवारी 2018 मध्ये पळून जाऊन चेन्नई इथं विवाह केला. कनगराज हे ड्रायव्हर असून ते चेन्नई इथं नोकरी करत होते, मात्र लॉकडाउन दरम्यान त्यांची नोकरी गेली. त्यामुळं ते आणि त्यांची पत्नी पुल्लूर या गावी परत आले. खाप पंचायतीनं त्यांच्यावर आधीच अडीच लाख रुपयांचा दंड ठोठावला होता, गावात यायचं असेल तर हा दंड भरला पाहिजे अशी सक्ती पंचायतिनं केली. दुसऱ्या जातीतील मुलीशी लग्न केल्यास दंड भरावा लागतो, हे आमच्या गावात नेहमीचं आहे. पण दंडाची रक्कम 5-10 हजार असते. आमच्यासाठी मात्र ती अडीच लाख करण्यात आली. मी पंचायतीला 25 हजार भरण्याची तयारी दाखविली, मात्र त्यांनी हा प्रस्ताव स्वीकारला नाही, त्यामुळं आता मी कोणताही दंड भरण्यास तयार नाही असं स्पष्ट करताच पंचायतीचे सदस्य मात्र दंड भरण्यासाठी दबाव आणत आहे, असं कनगराज यांनी सांगितलं. मी आणि माझी पत्नी गावातील एका धार्मिक समारंभाला उपस्थित राहू इच्छित होतो मात्र पंचायतीनं आम्हाला देवळात प्रवेश करू दिला नाही, असा आरोपही कनगराज यांनी केला आहे. आम्ही गावी परत आल्यापासून दोन वेळा खाप पंचायत बोलावण्यात आली असून, पंचायत प्रमुख दंड भरण्यासाठी आमच्यावर दबाव आणत आहेत, असंही कनगराज यांनी सांगितलं.
अखेर कनगराज यांनी थिमामपेट्टा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीदरम्यान, पंचायतीच्या इलप्पन आणि नागेश या दोन प्रमुख पंचांनी दंड मागे घेऊ असं सांगितलं, पण प्रत्यक्षात मात्र ते दंड भरण्यासाठी दबाव आणत असल्याचं कनगराज यांनी सांगितलं. पंचायत प्रमुख इलप्पन यांनी हा आरोप फेटाळून लावत, पंचायतीनं कोणताही दंड लावला नसल्याचं सांगितलं. या दोघांनी लग्न केल्यापासून दोन्ही कुटुंबांमध्ये वाद धुमसत आहे. त्यांच्यातील सततच्या भांडणामुळं गावातली शांतता भंग पावत आहे. त्यामुळं 500 किंवा तत्सम दंड त्यांना करण्यात आला आहे. गावातील लोक गरीब आहेत, हे माहित असताना पंचायत कशाला मोठा दंड ठोठावेल, असा खुलासा इलप्पन यांनी केला. दरम्यान, गेल्या आठवड्यात देवळातील एका कार्यक्रमात इलप्पन आणि त्याच्या साथीदारांनी कनगराज यांच्या सासऱ्यांना मारहाण केली. तेव्हा कनगराज यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यावेळी इलप्पन यांनीही कनगराज आणि त्यांच्या कुटुंबाच्या विरुद्ध तक्रार केली. आता दोन्ही बाजूंनी एकमेकांविरोधात तक्रारी नोंदवल्या आहेत.
या प्रकरणी थिरूपाथुर जिल्ह्याचे पोलिस महाआधीक्षक विजयकुमार म्हणाले, ‘ दोन्ही बाजूमध्ये कोणताही पैशाचा व्यवहार झालेला नाही, आणि दंड लादल्याबद्दल कोणतीही तक्रारदेखील नाही. मंदिरातील कार्यक्रमा दरम्यान काढण्यात आलेल्या मिरवणुकीत दोन्ही बाजूंची भांडणे झाली, त्यामुळं दोघांनीही तक्रार केली आहे. दोन्ही बाजूंच्या एफ आय आर आम्ही नोंदवून घेतल्या आहेत. दोन महिन्यापूर्वी शेजारील गावातही अशाप्रकारे दंड लादणाऱ्या दोघांना आम्ही ताब्यात घेतलं होतं. त्यामुळं अशी काही तक्रार आल्यास आम्ही तत्काळ कारवाई करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.