नवी दिल्ली, 10 नोव्हेंबर: काही दिवसांपूर्वीच पद्म पुरस्कारांचं (Padma Awards) वितरण झालं आहे. गेल्या काही वर्षांपासून तळागाळातल्या, ज्यांच्या कामाबद्दल लोकांना जास्त माहिती नाही अशा नागरिकांना पद्म पुरस्कार देण्यात येत आहेत. भारत सरकारने चक्क एका पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यालाही (Pakistani Lt. Col. Awarded Padma award) पद्म पुरस्कार दिला आहे. ऐकायला खोटं वाटत असलं, तरी ही बाब पूर्णपणे खरी आहे. या अधिकाऱ्याबाबत आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.
1971 मध्ये पाकिस्तानी लष्करात 20 वर्षांचा एक जवान भरती झाला होता. त्याचं नाव होतं लेफ्टनंट कर्नल (Kazi Sajjad Padma Shri) काजी सज्जाद. याच अधिकाऱ्याला भारतातल्या चौथ्या सर्वोच्च नागरी सन्मानाने म्हणजेच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. काजी सज्जाद अली जहीर (Lt. Col. Sajjad Quazi) असं पूर्ण नाव असलेल्या सज्जाद यांची भारत-पाक युद्धाच्या काही दिवसांपूर्वीच लष्करात भरती झाली होती. त्यांची नियुक्ती पूर्व पाकिस्तानच्या (आताचा बांगलादेश) सियालकोट भागात झाली होती. त्या ठिकाणी पाकिस्तानी सैन्यामार्फत करण्यात येणारा क्रूर अत्याचार त्यांना सहन झाला नाही. त्यामुळे एक दिवस आपल्या लष्कराची महत्त्वाची कागदपत्रं आणि नकाशे बुटामध्ये लपवून ते भारतात पळून आले.
सीमेवर पकडल्यानंतर त्यांच्याकडे 20 रुपये आणि सैन्याची कागदपत्रं मिळाली. त्या वेळी त्यांना पाकिस्तानी गुप्तहेर समजून पकडण्यात आलं. चौकशीसाठी पठाणकोटला आणल्यानंतर सज्जाद यांनी पाकिस्तानी सैन्याची योजना भारतीय अधिकाऱ्यांना सांगितली. भारतीय सैन्याने त्यानुसार कारवाई केली आणि सज्जाद यांनी दिलेली माहिती अगदीच खरी ठरली. यानंतर मग सज्जाद यांना दिल्लीला पाठवण्यात आलं. त्या ठिकाणी त्यांना कित्येक महिने एका सुरक्षित घरात ठेवण्यात आलं. त्यानंतर बांगलादेशला स्वतंत्र करण्यासाठी मुक्ती वाहिनीला छापामार युद्धाचं ट्रेनिंग दिल्यानंतर त्यांना बांगलादेशला पाठवण्यात आलं.
रस्ते, जल की विमान वाहतूक? 'ही' वाहनं करतात सर्वाधिक कार्बन उत्सर्जन
सज्जाद यांच्या नावावर पाकिस्तानमध्ये डेथ वॉरंट जारी असल्याची माहिती 'इंडिया टुडे'च्या रिपोर्टमध्ये देण्यात आली आहे. सुमारे 50 वर्षांपूर्वी हे वॉरंट जारी करण्यात आलं होतं. सज्जाद सांगतात, की पाकिस्तानी सेना ही त्या काळी आपल्याच लोकांविरोधात क्रूरपणे वागत होती. तेव्हाची प्रत्येक घटना आपल्याला आजही लक्षात असल्याचं सज्जाद सांगतात.
त्यांनी सांगितलं, “तेव्हा जिन्नांचं पाकिस्तान हे कब्रस्तान झालं होतं. आम्हाला दुय्यम वागणूक दिली जात होती. ज्या लोकशाहीचं आम्हाला वचन देण्यात आलं होतं, ती लोकशाही आम्हाला कधीच मिळाली नाही. आम्ही कायमच वंचित राहिलो. सियालकोटमध्येही एलिट पॅरा ब्रिगेडमध्ये कार्यरत असूनही आम्हाला वेगवेगळं ठेवण्यात आलं होतं.” या कारणांमुळेच आपण पाकिस्तान सोडल्याची माहिती सज्जाद यांनी दिली.
काजी सज्जाद यांच्या 71च्या युद्धामधल्या कामगिरीसाठी त्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं आहे. त्यांना बांगलादेशमधल्या बीर प्रोतिक (आपल्या वीर चक्र पुरस्कारासारखा) हा पुरस्कार आणि बांगलादेशचा सर्वोच्च नागरी सन्मान असलेलं स्वाधीनता पदकही दिलं गेलं आहे. सज्जाद यांचे वडीलही सैन्यातच होते. ते ब्रिटिश आर्मीमध्ये तैनात होते, अशी माहिती सज्जाद यांनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: India, Padma award