नवी दिल्ली, 25 फेब्रुवारी : अपघाताच्या अनेक घटना रोज घडत असतात. एखाद्या व्यक्तीचा अचानक अपघाती मृत्यू झाल्याने तिच्या कुटुंबीयांना तो धक्का पचवणं खूप कठीण असतं. काही वेळा कुटुंबीय असे धक्के पचवू शकतात; पण काही वेळा मात्र प्रकृती ढासळणं, चक्कर येऊन पडणें किंवा काही बाबती मानसिक धक्क्यातून एखाद्याचा जीवही जाऊ शकतो. अशीच एक धक्कादायक घटना गुजरातमध्ये घडली आहे. या घटनेनंतर हळहळ व्यक्त केली जात आहे. नवसारी शहरात एक धक्कादायक घटना घडली आहे. पतीच्या निधनाची बातमी समजताच पत्नीला मोठा धक्का बसला. पतीच्या मृत्यूनंतर अर्ध्या तासातच पत्नीचा मृत्यू झाला. या घटनेनंतर कुटुंबावर शोककळा पसरली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. हेही वाचा - ‘अंत्यसंस्काराच्या वेळी कुटुंबीयांनी माझे मांस खावे’ व्यक्तीची शेवटची इच्छा ऐकून बसेल धक्का ही घटना नवसारीमधल्या खेरगाम इथल्या तोरवनवेरा गावात घडली आहे. इथं एका अपघातात अरुण गावित या 38 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. हे वृत्त समजताच मृत अरुणची पत्नी भावना बेशुद्ध पडल्या. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं; पण त्यांचा मृत्यू झाला. भावना यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला, असं डॉक्टरांनी सांगितलं. पतीचा मृत्यू झाल्याचा धक्का बसल्याने अवघ्या अर्ध्या तासात पत्नीचाही मृत्यू झाला. या जोडप्याला दोन मुलं आहेत. पती-पत्नीच्या मृत्यूमुळे दोन्ही मुलांवरून आई-वडिलांचं छत्र हरपलं आहे. दोन्ही मुलं पालकांच्या अचानक झालेल्या निधनाने अनाथ झाली आहेत. मृत भावना गावित खेरगामच्या माजी सरपंच होत्या.
पतीच्या मृत्यूची बातमी कळताच पत्नीचेही निधन झाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. अरुण गावित यांचा गुरुवारी रात्री गावातच दुचाकी घसरल्याने अपघाती मृत्यू झाला. अरुण गावित यांच्या निधनाची बातमी समजताच त्यांच्या पत्नी भावना गावित बेशुद्ध झाल्या. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आलं; पण त्यांना बसलेला धक्का इतका तीव्र होता, की त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांचं निधन झालं. या घटनेनंतर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, तर गावावर शोककळा पसरली आहे. अरुण व भावना यांची मुलं या घटनेनंतर अचानक पोरकी झाली आहेत.