जयपूर, 11 ऑगस्ट : रेल्वेतून (railway) प्रवास करत असताना रेल्वेच्या डब्यात असणाऱ्या उंदरांनी (rats) कुरतडल्यामुळे झालेलं बॅगेचं (bag) नुकसान रेल्वेनं भरून द्यावं, असा निर्णय ग्राहक तक्रार निवारण आयोगानं (CDRC) सुनावला आहे. रेल्वेतून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाची बँग उंदरांनी कुरतडली होती. त्यानंतर या प्रवाशानं नुकसान भरपाई (compensation) देण्यासाठी तक्रार नोंदवली होती. विशेष म्हणजे ही घटना घडून 8 वर्षं झाल्यानंतर हा निर्णय न्यायालयानं दिला आहे.
प्रवासादरम्यान कुरतडली बॅग
राजस्थानच्या सूरसागरमधील रहिवासी महेंद्र सिंह कच्छवाह हे 2 जानेवारी 2013 या दिवशी सूर्यनगरी एक्सप्रेसमधून अहमदाबाद ते जोधपूर असा प्रवास करत होते. या प्रवासात त्यांच्यासोबत असणारी बॅग उंदरांनी कुरतडली. त्यानंतर त्यांनी जोधपूर मंडल DAM यांच्याविरोधात तक्रार नोंदवून नुकसान भरपाईची मागणी केली. त्यावर सुनावणी करणाऱ्या ग्राहक तक्रार निवारण आयोगानं 8 वर्षांनंतर फैसला सुनावला आहे.
रेल्वेचा दावा फेटाळला
रेल्वेनं प्रवास करताना महेंद्र यांनी केवळ स्वतःचंच तिकीट काढलं होतं, मात्र बॅगेचं तिकीट काढलं नव्हतं, असा दावा रेल्वेच्या वतीनं करण्यात आला. मात्र प्रवासात बॅग सोबत घेण्याच्या सुविधेसह तिकीट दिलं जात असल्याचं सांगत कोर्टानं हा दावा फेटाळून लावला. प्रवासी आणि त्यांच्या साहित्याच्या सुरक्षेची जबाबदारी रेल्वेवरच असून त्याचे नुकसान झाले, तर रेल्वेनं भरपाई द्यायला हवी, असा फैसला कोर्टानं सुनावला.
हे वाचा -उपाशी पोटी गोठ्यात झोपवल्याचा घेतला बदला; लेकानं जन्मदात्याचा केला खेळ खल्लास
द्यावी लागणार नुकसान भरपाई
या प्रकरणी ग्राहक तक्रार निवारण आयोगानं रेल्वेला 5 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्याचसोबत सुटकेसची नुकसान भरपाई म्हणून 2 हजार 790 रुपये महेंद्र यांना अदा करावेत, असा आदेशही ग्राहक तक्रार निवारण आयोगानं दिला आहे. हे पैसे देण्यासाठी दोन महिन्यांची मुदत रेल्वेला देण्यात आली आहे. त्याचप्रमाणं हा खटला चालवताना महेंद्र यांना जो खर्च आला तो पकडून एकूण 10 हजार 790 रुपये रेल्वेला द्यावे लागणार आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Indian railway, Railway