नवी दिल्ली, 18 जुलै : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात (Union Cabinet Expansion) सर्वाधिक चर्चिलं गेलेलं नाव म्हणजे अश्विनी वैष्णव. (Ashwini Vaishnav) रेल्वे आणि इलेक्टॉनिक्ससारख्या (Railway and Eletronics) अत्यंत महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी वैष्णव यांच्याकडे देण्यात आल्यामुळे अनेकांना आश्चर्य वाटलं. राजकीय प्रसिद्धीपासून आतापर्यत जाणीवपूर्वक दूर राहिलेल्या वैष्णव यांचा एक अधिकारी म्हणून सुरु झालेला प्रवास आता केंद्रीय मंत्रिपदापर्यंत येऊन ठेपला आहे.
प्रभावी अधिकारी
1994 च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेल्या वैष्णव यांनी अतिशय महत्त्वपूर्ण आणि वैविध्यपूर्ण जबाबदाऱ्या निभावल्या आहेत. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या माध्यमातून अनेक प्रकल्प यशस्वी करण्याच्या प्रक्रियेत वैष्णव यांचा सहभाग राहिला आहे. जनरल इलेक्ट्रिक आणि सिमेन्ससारख्या मोठ्या कंपन्यांमध्येही त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.
उच्चशिक्षित वैष्णव
आयएएस अधिकारी असणाऱ्या वैष्णव यांनी पेन्सिलव्हेनिया विद्यापीठातून एमबीएचं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर आयआयटी कानपूरमधून ते एम.टेक झाले. त्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रात काम करण्याचा त्यांचा अनुभव आणि इतक्या वर्षांची प्रदीर्घ कारकिर्द यांच्या जोरावर त्यांच्याकडे रेल्वे आणि इलेक्ट्रॉनिक्स या दोन महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. यापूर्वी एस. जयशंकर यांच्या परराष्ट्र खात्यातील अनुभवाचा विचार करून त्यांना परराष्ट्र मंत्रिपद देण्याचा निर्णय पंतप्रधान मोदींनी घेतला होता. त्यावेळीदेखील अऩेकांना आश्चर्य वाटलं होतं. आता पुन्हा वैष्णव यांच्याकडे रेल्वेसारखं खातं दिल्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे.
वाजपेयींसोबत कामाचा अनुभव
भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना 1999 साली देशात भीषण वादळाचे हाहाकार उडवून दिला होता. त्यावेळी मदत आणि पुनर्वसनाच्या कामात वैष्णव यांनी एक अधिकारी म्हणून मोठी भूमिका निभावली होती. योग्य वेळेत सर्व ठिकाणी अलर्ट पोहोचल्यामुळे अऩेकांचे प्राण वाचले होते. त्यांच्या या कार्यतत्परतेचं मोठं कौतुक झालं होतं. 2003 सालापर्यंत त्यांनी ओडिशामध्ये काम केलं आणि नंतर तत्कालिन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे उपसचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती.
हे वाचा -PM मोदींनंतर मुख्यमंत्री अॅक्शनमध्ये, चेंबूर दूर्घटनेनंतर सरकारकडून मदतीचा ओघ
मोदींचे निकटवर्तीय
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरातचे मुख्यमंत्री असल्याच्या काळापासूनच वैष्णव यांचे त्यांच्याशी घनिष्ट संबंध आहेत. रविशंकर प्रसाद आणि पियुष गोयल यांच्यासारख्या बड्या नेत्यांना हटवून त्यांची खाती वैष्णव यांच्याकडे देण्यात आली आहेत. दोन वर्षांपूर्वी त्यांची ओडिशातून राज्यसभेवर नियुक्ती झाली. भाजपकडे पुरेसं संख्याबळ नसतानाही त्यांची निवड होणं, हा राजकीय रणनितीचा मोठा विजय मानला गेला.
वैष्णव यांच्याकडं मोठी जबाबदारी असल्यामुळे त्यांच्या खात्याची जबाबदारी भविष्यात ते कसे पार पडतात, याकडं सर्वांचंच लक्ष असणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.