नवी दिल्ली, 28 ऑक्टोबर : राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) नेहमीच वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असतात. अलीकडेच झालेल्या पश्चिम बंगालच्या (West Bengal) विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला मिळालेल्या मोठ्या विजयात प्रशांत किशोर यांचा मोठा वाटा होता. त्यानंतर ते काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याच्या चर्चा सर्वत्र सुरू झाल्या होत्या. प्रत्यक्षात मात्र तसं अद्याप काही झालेलं नाही. सध्या ते गोव्यात पुढच्या वर्षी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसला (TMC) कितपत संधी आहेत, याची चाचपणी करण्यासाठी गोव्यात आहेत. गोव्यातल्या म्युझियममधल्या एका कार्यक्रमात त्यांनी केलेलं वक्तव्य सध्या चर्चेत आहे. भारतीय जनता पक्ष पुढील अनेक वर्षं भारतीय राजकारणाच्या केंद्रस्थानी राहील, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.
प्रशांत किशोर म्हणाले, 'ज्याप्रमाणे आधीची 40 वर्षं काँग्रेसची (Congress) होती, त्याप्रमाणे आगामी अनेक दशकं भारतीय जनता पक्ष (BJP) भारतीय राजकारणाचा केंद्रबिंदू होऊन राहील. तो पक्ष जिंकेल किंवा कदाचित हरेलही; मात्र त्याचा त्यांच्या प्रभावाशी काही संबंध नाही. भारतात एकदा एखाद्या पक्षाने 30 टक्के मतं मिळवली, की त्याचा प्रभाव कमी कालावधीत घटत नाही. त्यामुळे नागरिक सरकारवर रागावले असल्यामुळे मोदींची सत्ता नेस्तनाबूत करतील, अशा भ्रमात कोणीही राहू नये. कदाचित नागरिक मोदींना (Narendra Modi) परत निवडून देणार नाहीत; मात्र तरीही भाजप राजकारणाच्या केंद्रस्थानी राहील. विरोधी पक्षांना अनेक दशकं भाजपचा सामना करावा लागेल.' 'झी न्यूज हिंदी'ने त्याबद्दलचं वृत्त दिलं आहे.
वाचा : ...म्हणून 'हे' आमदार गेल्या 20 वर्षांपासून वापरतायत Toyota Qualis
राहुल गांधींनी (Rahul Gandhi) नरेंद्र मोदींची ताकद ओळखावी असा सल्लाही प्रशांत किशोर यांनी दिला आहे. 'ते (राहुल गांधी) नरेंद्र मोदींची क्षमता ओळखून घेत नाहीत. ते असा विचार करत आहेत, की काही कालावधीनंतर नागरिक मोदींना सत्तेतून हटवतील; मात्र तसं होणार नाही. जोपर्यंत तुम्ही मोदींची ताकद ओळखत नाही आणि त्यांची मजबुती लक्षात घेत नाही, तोपर्यंत तुम्ही त्यांच्याविरुद्ध लढू शकणार नाही. मोदींची बलस्थानं कोणती हे समजून घेण्यात वेळ न घालवताच लोक असा विचार करत आहेत, की मोदी इतके लोकप्रिय कसे होत आहेत; पण त्यांचा सामना करायचा असेल, तर ही गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे,' असं प्रशांत किशोर म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं युग संपेल याची प्रतीक्षा करणं ही राहुल गांधी यांची चूक आहे. तसंच, मोदी लाट असेपर्यंतच भाजप सत्ते राहील असं समजणं हीदेखील चूक आहे, असंही प्रशांत किशोर म्हणाले आहेत. प्रशांत किशोर यांचं हे वक्तव्य म्हणजे त्यांच्या राजनीतीचाच भाग आहे की आणखी काही, याबद्दल चर्चा होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Narendra modi, Prashant kishor, Rahul gandhi