नवी दिल्ली, 22 नोव्हेंबर: संसदेचे हिवाळी अधिवेशन (Parliament Winter Session) 29 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. मात्र, त्यापूर्वीच विरोधी पक्षांतील नेत्यांच्या भेटीगाठी सुरू झाल्या आहेत. अशातच, भाजपमध्ये (BJP) नाराज असलेले वरुण गांधी (Varun Gandhi ) येत्या काही दिवसांत भाजप सोडून तृणमूल काँग्रेसमध्ये (TMC) प्रवेश करू शकतात अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
पश्चिम बंगालच्या (West Bengal) मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) हिवाळी अधिवेशनापूर्वी तीन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर असणार आहेत. ममता बॅनर्जी 22 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर दरम्यान दिल्लीत राहणार आहेत. खासदार वरुण गांधी ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या संपर्कात आहेत. ममतांच्या या दौऱ्यादरम्यान, वरुण गांधी त्यांची भेट घेणार असून, त्यात तृणमूलमधील प्रवेशाबाबतची चर्चा पुढे सरकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
केंद्र सरकारच्या कॅबिनेट विस्तारामध्ये स्थान न मिळाल्याने वरुण गांधी नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच वरुण गांधी आणि त्यांची आई मनेका गांधी यांना पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून बाहेर काढण्यात आलं होतं. तेव्हापासून वरुण गांधी पक्षावर नाराज आहेत.
गेल्या काही दिवसांपासून वरुण गांधी यांनी पक्षावरील आपली जाहीर नाराजी अनेकदा व्यक्त केली. सोशल मीडियावर वरुण गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या धोरणावर टीका केली. केंद्र सरकारकडून घेतले गेलेले निर्णय तसेच पक्षाच्या धोरणांविरोधात सातत्याने टीका करत आहेत. त्यामुळेच वरुण गांधी हे लवकरच भाजपाला रामराम करुन तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Published by:Dhanshri Otari
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.