बंगळुरु, 8 एप्रिल: कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुराप्पा (B S Yediyurappa) यांच्याबद्दल भाजपामध्येच असंतोष वाढत चालला आहे. 'येडियुप्पा सरकार 2 मे नंतर कधीही जाणार' अशी भविष्यवाणी माजी मंत्री आणि ज्येष्ठ आमदार बसवनगौडा पाटील यंताळ (Basangouda Patil Yatnal) यांनी केली आहे. "सध्या अनेक मंत्री आणि आमदारांना मुख्यमंत्र्याच्या बाजूनं मीडियासमोर बोलण्याची बळजबरी केली जात आहे. या परिस्थितीमध्ये 17 एप्रिलनंतर बदल होईल," असा दावा येडियुरप्पा यांचे कट्टर विरोधक मानले जाणाऱ्या पाटील यांनी केला आहे.
"काही जण आकाशात चंद्र आणि सूर्य असेपर्यंत येडियुरप्पा मुख्यमंत्री असतील असा दावा करत आहेत. हे कसं शक्य आहे? येडियुरप्पा यांना मुख्यमंत्रीपदीपदाचा दोन वर्षांचा बोनस मिळाला आहे. त्यांनी याबाबत पक्षाचे हायकमांड आणि कार्यकर्त्यांचे आभार मानावेत आणि 17 एप्रिलनंतर स्वत:हून निवृत्त व्हावं." अशी मागणी त्यांनी केली आहे.
" 2 मे नंतर कधीही बदल होईल. उत्तर कर्नाटाकामधील नेता राज्याचा मुख्यमंत्री होईल, " असा दावाही पाटील यांनी केला. बेळगाव लोकसभा तसंच मस्की आणि बसवकल्याण विधानसभा मतदारसंघामध्ये 17 एप्रिल रोजी पोटनिवडणूक होणार आहे. त्या निवडणुकीचा निकाल 2 मे रोजी लागेल. त्याचबरोबर पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचा निकाल 2 मे रोजी लागणार आहे. त्यामुळे कर्नाटकातील मुख्यमंत्री बदल 2 मे नंतर होईल असा पाटील यांचा दावा आहे. विजापूर शहराचे आमदार असलेल्या पाटील यांनी यापूर्वी देखील अनेकदा येडियुरप्पा यांच्यावर टीका केली आहे.
( देवेंद्र फडणवीस बेळगावात करणार प्रचार? लोकसभा पोटनिवडणुकीमध्ये स्टार प्रचारक )
पाटील यांनी यापूर्वी येडियुराप्पा सरकारवर टीका करताना कारणे दाखवा नोटीस देखील बजावली होती. भाजपाच्या केंद्रीय नेतृत्त्वाला राज्यात काय सुरु आहे याची कल्पना आहे, असा पाटील यांचा दावा आहे. ते (हायकमांड) घोटाळे आणि बदली माफियांना पाहत आहेत. आता तर उच्च न्यायालयानंही सरकारवर ताशेरे ओढले आहेत, असा टोला पाटील यांनी लगावला. येडियुरप्पा यांचे पूत्र बी.वाय. विजेंद्र यांच्यावरही पाटील यांनी टीका केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Belgaum, BJP, Karnataka, Yediyurppa