नवी दिल्ली, 15 जून : बिपरजॉय चक्रीवादळ वेगाने गुजरातकडे सरकत असून किनाऱ्या धडकण्यास सुरुवात झाली आहे. सौराष्ट्र आणि कच्छमध्ये त्याचा अधिक परिणाम होऊ शकतो. त्याचा परिणाम महाराष्ट्र आणि राजस्थानमध्येही दिसून येत आहे. समुद्रात उंच लाटा उसळत आहेत. अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. याशिवाय एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या अनेक तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. राज्य आणि केंद्र सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. बिपरजॉयमुळे आज द्वारकाधीश मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. हवामान खात्याने म्हटले आहे की अरबी समुद्रातील सक्रिय चक्रीवादळ गुजरातच्या किनारपट्टीकडे सरकल्यामुळे सौराष्ट्र-कच्छ प्रदेशातील काही भागात जोरदार वारे आणि मुसळधार पाऊस पडला. मे 2021 मध्ये आलेल्या ‘ताउते’ चक्रीवादळानंतर दोन वर्षांत राज्यात धडकणारे हे दुसरे चक्रीवादळ असेल. भारतीय हवामानशास्त्र विभाग (IMD) च्या मते, चक्रीवादळ ‘बिपरजॉय’ गुरुवारी संध्याकाळी 150 किमी प्रतितास वेगाने वाऱ्यासह ‘अत्यंत तीव्र चक्री वादळ’ म्हणून जखाऊ बंदराच्या जवळ पोहचेल. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल बुधवारी रात्री गांधीनगरमधील स्टेट इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर (SEOC) येथे पोहोचले आणि एकूण परिस्थिती आणि प्रशासनाने आतापर्यंत उचललेल्या पावलांचा आढावा घेण्यासाठी उच्च अधिकाऱ्यांची बैठक घेतली. वाचा - Cyclone Biparjoy : अंतराळातून दिसलं ‘बिपरजॉय’चं भयान रूप; NASA कडून वादळाचे फोटो प्रसिद्ध; 1 लाख लोकांचे स्थलांतर एनडीआरएफचे लक्ष गुजरात-महाराष्ट्रावर किनारपट्टीचा परिसर पूर्णपणे रिकामा करण्यात आला आहे. सध्या अरबी समुद्राच्या या भागात कोणतेही समुद्री जहाज नाही. मच्छिमारांना या परिसरातून आधीच बाहेर काढण्यात आले होते. 10 जूनपासून किनारी भाग रिकामा करण्याचे काम सुरू आहे. भारतीय रेल्वेनेही या भागातून जाणाऱ्या सुमारे 100 गाड्या रद्द केल्या आहेत.
NDRF चे मुख्य लक्ष गुजरात व्यतिरिक्त उत्तर महाराष्ट्रातील किनारी भागावर आहे.