दिब्रुगड, 20 जुलै: आसाममधल्या (Assam) एका महिला डॉक्टरला एकाच वेळी कोरोनाच्या डेल्टा आणि अल्फा (Delta Variant) या दोन्ही व्हेरिएंट्सचा (Alpha Variant) संसर्ग झाल्याचं संशोधनातून स्पष्ट झालं आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) या संस्थेच्या दिब्रुगड इथल्या प्रादेशिक वैद्यकीय संशोधन केंद्रात (RMRC) केलेल्या चाचण्यांमधून यावर शिक्कामोर्तब झालं. दोन प्रकारच्या व्हेरिएंट्सचा एकाच वेळी संसर्ग होण्याची ही भारतातली पहिलीच ज्ञात घटना असू शकते, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. एबीपी लाईव्ह, तसंच हिंदुस्तान टाइम्सने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. संबंधित महिला डॉक्टरने कोरोना प्रतिबंधक (Anti Covid Vaccine) लशीचे दोन्ही डोस घेतले होते. दुसरा डोस घेतल्यानंतर एका महिन्यानंतर या डॉक्टरला कोरोनाच्या दोन्ही व्हेरिएंट्सचा संसर्ग झाला. तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागलं नाही. तसंच तिला लक्षणंही सौम्य प्रकारची (Mild Symptoms) होती. घरच्या घरीच केलेल्या उपचारांनी ती बरी झाली. संबंधित महिलेचे पतीही डॉक्टर असून, त्यांनाही अल्फा व्हेरिएंटची लागण झाली होती. हा व्हेरिएंट सर्वांत आधी ब्राझीलमध्ये आढळला होता. ‘अशा प्रकारचा दुहेरी संसर्ग तेव्हाच होतो, जेव्हा दोन व्हेरिएंट्सची एखाद्या व्यक्तीला एकाच वेळी किंवा अगदी थोड्या अंतराने लागण होते. एखाद्या व्यक्तीला एका व्हॅरिएंटचा संसर्ग होतो, त्यानंतर दोन-तीन दिवसांत आणि शरीरात अँटीबॉडीज (Antibodies) विकसित होण्याच्या आधी दुसऱ्या व्हेरिएंटचा संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्यास किंवा कोणत्याही प्रकारे संपर्कात आल्यास दुसऱ्या व्हेरिएंटचा संसर्ग होऊ शकतो,’ असं प्रादेशिक वैद्यकीय संशोधन केंद्रातले वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. बी. जे. बोर्काकोटी यांनी सांगितलं. हेही वाचा- कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटवर लक्ष देण्याची अत्यंत गरज, WHO नं दिला सावधानतेचा इशारा 2021च्या फेब्रुवारी-मार्च महिन्यात दुसऱ्या लाटेच्या (Second Wave) सुरुवातीला आसाममध्ये आढळत असलेल्या बहुतांश कोरोनाबाधितांना अल्फा व्हेरिएंटचा संसर्ग झाला होता. तसंच, एप्रिलमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांनंतर होत असलेल्या संसर्गांमध्ये डेल्टा व्हेरिएंटच्या संसर्गांचं प्रमाण जास्त होतं, असंही डॉ. बी. जे. बोर्काकोटी यांनी स्पष्ट केलं. आसाममध्ये सध्या 20 हजारांहून अधिक अॅक्टिव्ह केसेस आहेत. तसंच, दररोज दोन हजार नवे रुग्ण आढळत असल्याचं ‘एबीपी लाइव्ह’च्या वृत्तात म्हटलं आहे. दिब्रुगडमध्ये (Dibrugarh) सर्वांत जास्त रुग्णसंख्या असल्याने तिथे कोरोनाविषयक निर्बंध कडक करण्यात आले आहेत.
गेल्या 24 तासांत देशभरात नवे 38 हजार 164 कोरोनाबाधित आढळले आहेत. तसंच 38 हजार 660 बाधितांना बरं झाल्यावर घरी सोडण्यात आलं आहे. देशात आतापर्यंत सव्वाचार लाख रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला आहे.