मुंबई, 18 जून : सैन्यभरतीसाठी केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या अग्नीपथ योजनेला (Agnipath Scheme) देशभरातून विरोध होत आहे. या विरोधात आता काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी उडी घेतली आहे. राहुल गांधी यांनी ट्विट करत मोदी सरकारवर टीका केली. त्याचबरोबर पंतप्रधानांना ‘माफीवीर’ असा टोलाही लगावलाय. राहुल गांधी यांनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हंटलं आहे की, ‘8 वर्षांपासून सातत्यानं भाजपा सरकारनं ‘जय जवान, जय किसान’ या मुल्यांचा अपमान केला आहे. मी यापूर्वी देखील सांगितले होते की पंतप्रधानांना काळे कृषी कायदे परत घ्यावे लागतील. त्याच पद्धतीनं त्यांना ‘माफीवीर’ होऊन देशातील तरूणांची मागणी मान्य करावी लागेल आणि ‘अग्निपथ’ परत घ्यावे लागेल.’
8 सालों से लगातार भाजपा सरकार ने ‘जय जवान, जय किसान' के मूल्यों का अपमान किया है।
— Rahul Gandhi (@RahulGandhi) June 18, 2022
मैंने पहले भी कहा था कि प्रधानमंत्री जी को काले कृषि कानून वापस लेने पड़ेंगे।
ठीक उसी तरह उन्हें ‘माफ़ीवीर' बनकर देश के युवाओं की बात माननी पड़ेगी और 'अग्निपथ' को वापस लेना ही पड़ेगा।
अग्निपथ योजनेचे घोषणा केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी केली. त्यानंतर या योजनेच्या विरोधात वेगवेगळ्या राज्यांमध्ये आंदोलन होत आहे. विशेषत: बिहारमध्ये या आंदोलनाची तीव्रता जास्त आहे. गेल्या दोन दिवसांपासून बिहारमध्ये या विरोधात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची धग उत्तर भारतामधील राज्यांप्रमाणेच दक्षिण भारतामध्येही पसरली आहे. शुक्रवारी तेलंगणामधील सिकंदराबाद रेल्वे स्टेशनवरही या योजनेच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. या आंदोलकांनी रेल्वेच्या संपत्तीचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलं. Agnipath Scheme : 4 वर्षानंतर काय करणार अग्निवीर? गृहमंत्रालयानं तयार केला खास प्लॅन बिहारमध्ये राजदच्या नेतृत्वाखालील महाआघाडी तसेच विविध विद्यार्थी संघटनांसह अनेक विरोधी पक्षांनी शनिवारी बिहार बंदची हाक दिली आहे.बिहार बंद दरम्यान परिस्थिती बिघडल्यास ती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी जोरदार तयारी केली आहे. एडीजी संजय सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहारमध्ये ज्या भागात तणावाचे वातावरण आहे त्या भागात तीन निमलष्करी दल तैनात करण्यात आले आहेत. सीआरपीएफ, आरएएफ आणि एसएसबीच्या एकूण 10 तुकड्यांना पाचारण करण्यात आले आहे. तैनात केलेल्या निमलष्करी दलांमध्ये आरएएफची एक तुकडी, सीआरपीएफच्या तीन कंपन्या आणि एसएसबीच्या सहा कंपन्यांचा समावेश आहे.