नागपूर, 3 जून: राज्यातील अनेक जिल्ह्यांत कोरोनाचा प्रादुर्भाव (Coronavirus) कमी झाल्याने काठी ठिकाणी निर्बंध शिथिल करण्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. त्यानंतर आज राज्याचे मदत आणि पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी पत्रकार परिषद घेत अनलॉकचे पाच टप्पे (Unlock in 5 levels) जाहीर केले. मात्र आता तासाभरातच ठाकरे सरकारने (Thackeray Government) आपल्या निर्णयावरून यू टर्न घेतला आहे. या संदर्भात आता राज्य सरकारने स्पष्टीकरण देत म्हटलं आहे की, राज्यातील निर्बंध हटवण्यात आले नाहीत, नव्या नियमांचा प्रस्ताव विचाराधीन आहे. यानंतर आता मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा प्रतिक्रिया देत संभ्रम आणखी वाढवला आहे.
विजय वडेट्टीवार यांनी पहिल्या टप्प्यातील 18 जिल्हे हे उद्यापासून संपूर्णत: अनलॉक होणार असल्याचं पत्रकार परिषदेत सांगितलं होतं. त्यानंतर सरकारने अद्याप अंतिम निर्णय झाला नसल्याचं जाहीर केलं. यानंतर मुंबईतून नागपुरात दाखल झालेल्या विजय वडेट्टीवार यांना यावर पत्रकारांनी विचारला असता त्यांनी म्हटलं, निर्णयात कुठलीही गफलत झाली नाहीये. अनलॉकच्या पाच टप्प्यांच्या संदर्भात आपत्ती आणि व्यवस्थापन विभागानं हा निर्णय घेतला. 5 टप्प्यांच्या संदर्भात तत्वत: मान्यता मिळाली मात्र या संदर्भातील अंतिम मुख्यमंत्री जाहीर (CM Uddhav Thackeray) करतील.
विजय वडेट्टीवार यांना पत्रकारांनी विचारले की, उद्या राज्यातील 18 जिल्हे अनलॉक होणार की नाही? यावर वडेट्टीवार म्हणाले, 5 टप्प्यांच्या संदर्भात तत्वत: मान्यता मिळाली आहे मात्र, अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेतील. यामुळे उद्या अनलॉक होणार की नाही हा गोंधळ अद्यापही कायम आहे आणि राज्यातील जनतेच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.
कोरोनाचा संसर्ग अजूनही आपण पूर्णपणे थोपविलेला नाही. ग्रामीण भागात काही ठिकाणी अजूनही संसर्ग वाढत आहे. कोरोना विषाणुचे घातक आणि बदलते रूप लक्षात घेऊनच निर्बंध शिथिल करावयाचे किंवा कसे याविषयी निश्चित करावे लागेल. राज्यातील निर्बंध उठविण्यात आलेले नाहीत. ब्रेक दि चेन मध्ये काही प्रमाणात निर्बंध शिथिल करावयास सुरुवात केली आहे,या पुढे जातांना आपत्ती व्यवस्थापन विभागाकडुन पाच टप्पे ठरविण्यात येत असून यासाठी साप्ताहिक पॉझिटिव्हिटी रेट आणि ऑक्सिजन बेडसची उपलब्धता हे निकष ठरविण्यात येत आहेत. राज्यात या निकषांच्या आधारे निर्बंध कडक किंवा शिथिल करण्यासंदर्भात विस्तृत मार्गदर्शक सुचना शासननिर्णयाद्वारे अधिसुचित करण्यात येतील.
अशा रीतीने निकषांचा आधार घेऊन टप्पेनिहाय निर्बंध शिथिल करण्याच्या बाबतीत प्रस्ताव विचाराधीन असून जिल्ह्यांच्या संबंधित प्रशासकीय घटकांकडून पूर्ण आढावा घेऊन अंमलबजावणीचा विचार केला जाईल. स्थानिक प्रशासनाकडून याविषयीची माहिती तपासून घेण्यात येत आहे. त्यानंतरच अधिकृत निर्णय कळविला जाईल तसेच हा निर्णय कसा लागू केला जाणार आहे ते उपरोक्त शासननिर्णयान्वये स्पष्ट करण्यात येईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.