मुंबई, 11 जानेवारी : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीवरून आता राज्यात राजकीय आखाडा तापायला लागला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी भाजपच्या पराभवाचे भाकित वर्तवले होते. तर, ‘शरद पवार पंतप्रधान कधी होतील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर कधी पडतील, याची भविष्यवाणी पवारसाहेबांनी करावी’ असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी लगावला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि संजय राऊत यांनी आज पत्रकारांशी बोलत असताना उत्तर प्रदेश आणि गोव्यात भाजपचा पराभव होणार असे भाकित वर्तवले होते, त्यांच्या टीकेला चंद्रकांत पाटील यांनी ट्वीट करून प्रत्युत्तर दिले आहे. ज्योतिष्य, कर्मकांड नाकारणारे शरद पवार आणि प्रबोधनकारांचा वारसा सांगणाऱ्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत भविष्यवेत्ते कधी झाले? उत्तर प्रदेश, गोव्यात सत्ता परिवर्तनाबाबत दावे समजू शकतो, पण छातीठोक भविष्यवाणी हे मनोरंजन आहे, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला.
ज्योतिष्य, कर्मकांड नाकारणारे @PawarSpeaks आणि प्रबोधनकारांचा वारसा सांगणाऱ्या शिवसेनेचे खा.@rautsanjay61 भविष्यवेत्ते कधी झाले? उत्तर प्रदेश, गोव्यात सत्ता परिवर्तनाबाबत दावे समजू शकतो, पण छातीठोक भविष्यवाणी हे मनोरंजन आहे.
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) January 11, 2022
तसंच, या दोन्ही महापुरुषांना खरोखरच ज्योतिष्य अवगत असेल, तर त्यांनी गोवा, उत्तर प्रदेशाबद्दल बोलण्यापेक्षा महाराष्ट्राबाबत भविष्य सांगावं. राऊत यांनी सांगावं की, शरद पवार पंतप्रधान कधी होतील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घराबाहेर कधी पडतील, याची भविष्यवाणी पवारसाहेबांनी करावी’ असा टोला पाटील यांनी लागवला. ‘नावापुरताच महाविकास असणारे हे सरकार प्रत्यक्षात मात्र महाविरोधाभास सरकार आहे. दोन वर्षांपासून ठप्प असलेले जनजीवन आता सुरळीत होत होते. त्यावर निर्बंध लावू नयेत असे राज्यातील जनता ओरडून ओरडून सांगत होती, परंतु या सरकारने आपला मनमानी कारभार राबवत विरोधाभासी प्रतिबंध लादले आहेत’ अशी टीकाही पाटील यांनी केली. ( ‘Taarak Mehta..’ फेम मिसेस सोढीच्या रिअल लाईफ पतीने सुशांतसोबत केलंय काम ) ‘हे सरकार जनता झोपलेली असताना संचारबंदी लावते, पण दिवसा लोकल्स, बसेस तुडुंब गर्दी भरून वाहत असतात. मॉल्स, रेस्टॉरंट्स, बार, ऑफिसेस अशा वातानुकूलित जागांना परवानगी मिळते, परंतु शारीरिक व मानसिक विकासासाठी आवश्यक असणाऱ्या विद्यालये, क्रीडांगणे इ. जागांवर मात्र प्रतिबंध लादले जातात. राज्यातील सर्वसामान्य जनतेला या सरकारमधील गोंधळाचा नाहक त्रास भोगावा लागत आहे, परंतु सरकार मात्र कुंभकर्णाची झोप घेत असून सर्वसामान्यांचा आवाज त्यांच्या कानी पोहोचलाच नाही. या महाविकास आघाडी सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? हा प्रश्न आज उभा महाराष्ट्र विचारत आहे’ अशी टीकाही पाटील यांनी केली.