मुंबई, 01 जून : राज्यात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. सर्वाधिक रुग्ण हे मुंबईत आढळले आहे. कोरोनावर मात करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहे. राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ज्या वरळी कोळीवाड्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या अचानक वाढली होती त्याबद्दल दिलासादायक माहिती दिली. आदित्य ठाकरे यांनी आपल्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवर वरळी कोळीवाड्याबद्दल महत्त्वाची घोषणा केली आहे. ‘सकारात्मक गोष्ट म्हणजे वरळी कोळीवाडा, जिथे सर्वप्रथम जास्त रुग्ण सापडले होते आणि कंटेनमेंट झोन बनविला गेला होता तिथे आता डी-कंटेनमेंट करण्यात आले आहे’ अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली.
आणखी एक सकारात्मक गोष्ट म्हणजे वरळी कोळीवाडा, जिथे सर्वप्रथम जास्त रुग्ण सापडले होते आणि कंटेनमेंट झोन बनविला गेला होता तिथे आता डी-कंटेनमेंट करण्यात आले आहे. केवळ अॅक्टिव्ह रुग्ण असलेले ठिकाणे सील केली आहेत.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) May 31, 2020
त्यामुळे, ‘वरळी कोळीवाड्यात केवळ कोरोनाचे अॅक्टिव्ह रुग्ण असलेले ठिकाणे सील केली आहेत’ असंही आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं. ‘मुंबईतला हा पहिला कंटेनमेंट झोन असल्याने कंटेनमेंट झोनच्या व्यावहारिक अडचणींबद्दल आपण पहिल्यांदाच समस्यांचा सामना केला. इतर भागांमध्ये कोविडशी लढण्यासाठी हे एक मॉडेल ठरले. तेथील रहिवाशांच्या सहकार्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे’ अशी भावनाही आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली.
वरळी हा आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ आहे. पहिल्यांदाच आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवली आणि आमदार म्हणून निवडून आले. मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना अचानक वरळी कोळीवाड्यातून सर्वाधिक रुग्ण समोर आले होते. त्यामुळे वरळीचा परिसर पूर्णपणे सील करून कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला होता. हेही वाचा - पुणेकरांना आता पडता येणार बाहेर, असे असतील नवे नियम आणि अटी संपादन - सचिन साळवे