जयगड, 05 नोव्हेंबर : गेली दोन महिने जयगड (Jaygad) येथे वादळामुळे अडकलेल्या मच्छीमारांची बोट (Boat) मुंबईच्या (Mumbai) दिशेने जात असताना पालशेत येथे बुडाली. मात्र, सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली झाली नाही. सर्व खलाश्यांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.
जयगड येथून मुंबईकडे जाणारी श्री सोमनाथ नावाची मच्छीमार बोट पहाटे 4.30 वाजेच्या सुमारास पालशेत किनाऱ्यावर बुडाली. या बोटीवरील 6 खलाशी व 1 तांडेल यांनी बोट वाचवण्याचा अखेरपर्यंत प्रयत्न केला. मात्र, नाईलाज झाल्याने समुद्रात उड्या टाकत त्यांनी किनारा गाठला. 2 तासांनी ते किनाऱ्यावर सुखरूप पोहोचले.
2 महिन्यांपूर्वी झालेल्या वादळाच्यावेळी मुंबईतील श्री सोमनाथ ही मच्छीमार नौका जयगड किनाऱ्यावर येऊन पोहोचली होती. गेले 2 महिने याच परिसरात ही नौका मच्छिमारी करत होती. ही नौका बुधवारी मुंबईच्या दिशेने निघाली होती. पालशेत बंदर परिसरातून ही नौका पुढे जात असताना पहाटे 4.30 वाजेच्या सुमारास बोटीत पाणी भरू लागले. संकट ओळखून तांडेलने नौका वेगाने किनाऱ्याच्या दिशेने आणण्याचा प्रयत्न केला. मात्र पाणी वाढतच गेले.
अखेर पालशेत बंदरापासून खोल समुद्रात बोट बुडाली. बोट आता वाचणार नाही हे लक्षात येताच 6 खलाशांसह तांडेलांनी समुद्रात उडी घेतली. सकाळी6.30 च्या सुमारास पोहोचले. पोलिसांना याबाबतचे वृत्त मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. बोट बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यात यश आले नाही.
या बोटीचे मालक नितीन नथुराम मोंडे असे असून ते मुंबईतील आहेत. बोटीवर राहुल संतोष दाभोळकर हे तांडेल म्हणून काम करत होते. तर अक्षय संतोष दाभोळकर, समीर संतोष दाभोळकर, सूर्यकांत शंकर भाटकर, जगदीश जगन्नाथ चिवेलकर, भरत लक्ष्मण भोमे, हरेश शंकर पाचकुडे अशी मच्छीमारांची नावे आहेत.
या दुर्घटनेत बोटीचे पूर्णत: नुकसान झाले आहे. मत्स्य व्यवसाय खात्याचे अधिकारी देसाई या प्रकरणात अधिक तपास करीत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.