मुंबई, 7 जुलै : महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय घडेल याचा नेम नाही. आज विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी शिवसेनेते प्रवेश केला आहे. ठाकरे गटाला हा मोठा धक्का आहे. पण, नीलम गोऱ्हे यांनी एक पत्रक प्रसिद्ध करून शिवसेनेत प्रवेश का गेला याचं स्पष्टीकरण दिलं आहे. आज गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी बोलताना त्यांनी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यांवर निशाणा साधला आहे. निलम गोऱ्हे यांचा शिवसेनेतील प्रवेश हा ऐतिहासिक असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
नीलम गोऱ्हे यांचं पत्र ‘गेल्या 25 वर्षांपासून एनडीएसोबत राजकीय पक्ष म्हणजे शिवसेना या पक्षात मी प्रवेश केला होता. शिवसेनेत मला खूप चांगले काम करता आले. सद्यस्थितीत सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगाने स्पष्ट निकाल दिला आहे की, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना अधिकृत आहे. केंद्रीय स्तरावर एनडीएने आणि भाजपच्या नेतृत्वाखाली अयोध्येत श्रीराम प्रभूंचे मंदिर, तलाक पीडित महिलांना न्याय, काश्मीरमध्ये तिरंगा ध्वज आणि समान नागरिक कायद्यासाठी सकारात्मक पावले उचलली आहे.पंतप्रधान मोदी आणि अमनित शहा यांची वरील सर्व समस्यांवर चांगली इच्छाशक्ती दिसत आहे, असं नीलम गोऱ्हे पत्रात म्हणाल्या. राष्ट्रीय स्तरातवरील भूमिका घेऊन देशात आणि राज्यात युतीचे सरकार बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या भूमिकांवर आयुष्य समर्पित केले, त्या भूमिकांचा सन्मान करून काम करत आहे. राष्ट्रीयत्व म्हणजेच हिंदुत्व या भूमिकेसोबत महिला विकासाला चालना, महिला आणि बालके, वंचित घटक, आदिवासी, शेतकरी या प्रश्नावर धोरणात्मक आणि प्रत्यक्ष कामाची गरज आहे. हे सर्व काम करण्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मी शिवसेनेच्या समर्थन करते आणि तसे करण्याचा निर्णय घेत आहे, मी उपसभापती पदावर असल्याने वैधानिक पदाच्या चौकटीचा सन्मान करतच हे काम करणार आहे, असंही गोऱ्हे यांनी स्पष्ट केलं.
आतापर्यंत 25 वर्ष मला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्यासोबतच उद्धव ठाकरे, यांनी जे कायम सहकार्य दिले त्याबद्दल कायम ऋणी आहे. आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे तसंच शिवसेनेचे पदाधिकारी आणि शिवसैनिकांना दिलेल्या सहकार्याबद्दल मी आभारी आहे, अशी भावनाही गोऱ्हेंनी व्यक्त केली.

)







