मुंबई, 22 जून : उद्धव ठाकरेंनी काही वेळापूर्वी फेसबुक लाइव्हच्या (Uddhav Thackeray) माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यानंतर महाराष्ट्राचे महाचाणक्य शरद पवार यांच्याशीही उद्धव ठाकरेंनी संपर्क केला. सत्ता वाचवण्यासाठी काय करता येईल, याबाबत सध्या महाविकास आघाडी सरकारमध्ये खलबतं सुरू आहेत.
यावेळी शरद पवारांनी (Sharad Pawar) उद्धव ठाकरेंना मोलाचा सल्ला दिल्याचं सांगितलं जात आहे. सत्ता वाचवण्यासाठी एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करा, असा सल्ला शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना दिल्याचं सांगितलं जात आहे. आपल्या फेसबुक लाइव्हमध्येही उद्धव ठाकरेंनी मी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देतो असं भावनिक आवाहन केलं होतं. दरम्यान शरद पवारांनाही एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करा असं सांगितलं आहे.
अडीच वर्षांपूर्वी शरद पवारांच्या आग्रहावरुन उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले होते. त्यानंतर आज पवारांनी त्यांना मुख्यमंत्रिपद सोडण्याचा सल्ला दिला आहे.
एकनाथ शिंदेंकडे सध्या शिवसेनेच्या 29 आमदारांच्या सह्या आहेत. मात्र कायद्यानुसार सत्तास्थापनेसाठी शिवसेनेच्या किमान 37 आमदारांची गरज असते. त्यामुळे अद्याप शिंदेंकडूनही सत्तास्थापनेसाठी कोणताही दावा करण्यात आलेला नाही.
उद्धव ठाकरेंची भावनिक साद...
शिवसेनेतील बंडखोरीनंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सरकार अल्पमतामध्ये आल्याचं स्पष्ट झालंय. दरम्यान आज मुख्यमंत्र्यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी ठाकरेंनी जनतेशी भावनिक साद घातली. हा उद्धव ठाकरेंचा शेवटचा डाव होता. या फेसबुक लाइव्हनंतर एकनाथ शिंदेंच्या निर्णयात काही बदल होतो का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, समोर येऊन माझ्याशी संवाद साधा. आज मी माझ्या राजीनाम्याचं पत्र तयार करून ठेवतो. संध्याकाळी बंडखोरी केलेल्या आमदारांनी यावं. मला खुर्चीचा कोणताही मोह नाही. मी ओढून ताणून खुर्चीवर बसणार नाही. मुख्यमंत्रिपद हे माझ्याकडे अनपेक्षितपणानं आलं. तुम्ही आम्हाला मुख्यमंत्री नको हे माझ्यासमोर येऊन सांगा. मी पद सोडून देईन. हे माझं नाटक नाही. संख्याबळही माझ्यासाठी गौण आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.