मुंबई, 12 जानेवारी : महाविकास आघाडी सरकारने (MVA Goverment) महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackery) यांची झेड सुरक्षा कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे मनसेच्या नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे मनसेनं आपल्या नेत्याला नवे सुरक्षा कवच दिले आहे.
दोन दिवसांपूर्वी राज्य शासनाने राज ठाकरे यांना देण्यात आलेली मुंबई पोलिसांची सुरक्षा कमी केली आहे. त्यामुळे आज राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानीतून एमआयजी क्लब येथे बैठकीसाठी येत असताना त्यांना खास महाराष्ट्र सैनिकांची सुरक्षा देण्यात आली. राज ठाकरे यांच्या गाडीच्या मागे आणि पुढे 2-2अशा चार गाड्या भरून सुरक्षारक्षक एमआयजी क्लब येथे पोहोचले.
मराठी माणसाचा आणि महाराष्ट्राचा आवाज पोहोचवणाऱ्या राज ठाकरे यांना महाराष्ट्राचा द्वेश करणाऱ्या लोकांच्या सुरक्षेची गरज नाही. महाराष्ट्र सैनिक हे राज ठाकरे यांची सुरक्षा करण्यास सक्षम आहेत, अशी भूमिका उत्तर मुंबई विभागाचे पदाधिकारी नयन कदम यांनी मांडली.
दुसरीकडे कृष्णकुंजवर कोरोना कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी ही शासनाची पोटदुखी ठरत आहे. राज ठाकरे रस्त्यावर उतरतील तर काय होईल या भीतीने आकसापोटी शासनाने सुरक्षा कमी केलेली आहे, अशी प्रतिक्रिया नितीन सरदेसाई यांनी दिली आहे.
आज 50 पदाधिकारी हे महाराष्ट्र रक्षक नावाचे टी-शर्ट घालून या बैठकीच्या ठिकाणी उपस्थित होते. मनसेच्या वतीने आज एमआयजी क्लब येथे आगामी ग्रामपंचायत आणि महानगरपालिका निवडणुकांसाठी रणनीती तयार करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. परंतु, राज ठाकरे यांना नुकतीच झालेली दुखापत पाहता ही बैठक आटोपती घेण्यात आली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: MNS, Z security