मुंबई, 10 जानेवारी : राज्यातील विरोधी पक्षांच्या नेत्यांची सुरक्षा कमी करण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची झेड सुरक्षा काढण्यात आली आहे. त्याचबरोबर महाविकास आघाडी सरकारच्या काही नेत्यांचीही सुरक्षेत कपात केली आहे.
महाविकास आघाडी सरकारची दोन दिवसांपूर्वी महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये विरोधी पक्षातील नेत्यांची सुरक्षा कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षा ताफ्यात देण्यात आलेली बुलेटप्रुफ गाडी काढण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या जीवाला धोका असल्याचा अहवाल असताना सुरक्षेत कपात करण्यात आली आहे. त्याचबरोबर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रविण दरेकर, प्रसाद लाड, यांच्याही सुरक्षा व्यवस्थेत मोठी कपात करण्यात आली आहे. तर विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांना वाय सुरक्षा दिली आहे ती आधी वाय प्लस सुरक्षा होती.
या नेत्यांना आणि दिग्गजांना वाढवली सुरक्षा
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना झेड सुरक्षा पुरवण्यात आली आहे. तर शत्रुघ्न सिन्हा यांना वाय प्लस सुरक्षा वाढवण्यात आली आहे. काँग्रेसचे मंत्री विजय वडेट्टीवार, सुनील केदार, राष्ट्रवादीचे नेते रामराजे निंबाळकर,दिलीप वळसे, शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.
त्याचबरोबर आमदार वैभव नाईक हे नारायण राणे यांचे विरोधक आहे म्हणून त्यांना सुरक्षा दिली. युवा सेनेचे नेते वरूण सरदेसाई, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा अजित पवार यांना प्रथमच सुरक्षा पुरवण्यात आली आहे. तसंच कोल्हापूरमध्ये माजी आमदार राजेश क्षीरसागर ओबीसी नेते प्रकाश शेंडगे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवल यांची सुरक्षा वाढवली आहे.
भाजप नेत्यांकडून विरोध
महाविकास आघाडी सरकारच्या या निर्णयाचा भाजपने विरोध केला आहे.
विरोधी पक्षनेते @Dev_Fadnavis यांच्या सुरक्षेत मोठी कपात, ताफ्यातील बुलेटप्रूफ गाडी काढली जाणार, त्याशिवाय भाजप प्रदेशाध्यक्ष @ChDadaPatil , @mipravindarekar यांच्याही सुरक्षा व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात कपात सरकारचा निर्णय म्हणजे हे कोत्या मनोवृत्तीचे, सूडाचे राजकारण आहे.
— Keshav Upadhye (@keshavupadhye) January 10, 2021
'सर्व नेते महाराष्ट्रात फिरून जनतेच्या भावभावना जाणत असतात. कोरोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे घरात बसलेले असताना सर्वाधिक देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात फिरले व जनतेला दिलासा दिला. काल ही भंडारा येथे तेच पोहचले. या नेत्यांच्या सुरक्षितता कपात करण हे निव्वळ सुडबुद्धीच राजकारण आहे, अशी टीका भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Raj Thackery, Z security