मुंबई 04 डिसेंबर: पदवीधर निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devandra Fadnavis) यांनी शिवसेनेलाच आत्मचिंतनाचा सल्ला दिला होता. या निवडणुकीत शिवसेनेला (Shivsena) एकही जागा मिळाली नाही असं म्हणत त्यांनी शिवसेनेला हा सल्ला दिला. त्यावर आता शिवसेनेने पलटवार केला आहे. आत्मचिंतनाची गरज शिवसेनेला नसून भाजपलाच आहे, अशी प्रतिक्रिया परिवहनमंत्री अनिल परब यांनी व्यक्त केली. तीन चाकांच्या रिक्षाने आज बुलेट ट्रेनला हरवले असा खोचक टोलाही त्यांनी लगावला. तीन पक्ष एकत्र आले तर काय निकाल लागू शकतो हे महाविकास आघाडीने दाखवून दिले आहे असंही ते म्हणाले.
अमरावती शिक्षक मतदारसंघाबाबत बोलताना परब म्हणाले की, "ती जागा यापूर्वी देखील शिवसेनेची नव्हती. या आधी तिथे अपक्षच निवडून आले होते व आता देखील तिथे अपक्षच निवडून आले आहेत. ती जागा भाजपने आताही जिंकली नाही. याउलट भाजपने त्यांच्या परंपरागत निवडून येणाऱ्या नागपूर पदवीधर सारख्या जागा गमावल्या आहेत त्यामुळे त्यांनीच आत्मचिंतन केलं पाहिजे.
महाविकास आघाडीबाबत प्रतिक्रिया देताना "महाराष्ट्रात यापुढे महाविकास आघाडी एकत्र लढल्यास दुसऱ्या कोणत्याच पक्षाला जागा राहणार नाही. या निवडणुकीत तीनही पक्ष महाविकास आघाडी म्हणून लढले व हे त्याचेच यश आहे. तीन पक्षांचे झेंडे जरी वेगवेगळे असले तरी अजेंडा मात्र एकच आहे. तीनही पक्षांच्या प्रमुखांनी ठरवलेल्या किमान समान कार्यक्रमावर महाविकास आघाडीचे सरकार काम करत आहे असही त्यांनी सांगितलं.
अमृता फडणवीसांबाबतीत विचारलेल्या प्रश्नावर, त्या राजकीय व्यक्ती नसल्यामुळे मी कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही असंही ते म्हणाले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.