मुंबई, 14 मे : अभिनेत्री केतकी चितळेने (Ketaki Chitale) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Chief Sharad Pawar) यांच्यावर फेसबुकवर अतिशय खालच्या पातळीवर टीका करणारी पोस्ट केली आहे. तिच्या या टीकेवर राज्यभरातून निषेध व्यक्त केला जातोय. विशेष म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) यांनी देखील केतकी चितळेने केलेल्या पोस्टवर आपली भूमिका मांडली आहे. केतकी चितळेची पोस्ट म्हणजे विकृती आहे. या विकृतीला वेळीच आवर घालायाला पाहिजे, असं मत राज ठाकरे यांनी ट्विटरवर व्यक्त केलं आहे. शरद पवरांसोबत आमचे मतभेद जरुर आहेत. पण ते वैचारिक मतभेद आहेत. केतकी चितळेने केलेल्या पोस्ट सारखं घाणेरड्या पातळीवर येणं साफ चूक आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, असं राज ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.
राज ठाकरे नेमकं काय म्हणाले?
"कोणीतरी केतकी चितळे नामक व्यक्तीने अतिशय खालच्या पातळीवर जाऊन घाणेरड्या शब्दात काहीतरी श्लोकासारखं लिहून फेसबुकवर पोस्ट प्रकाशित केलेली आमच्या निदर्शनास आणली गेली. खाली काहीतरी भावे वगैरे नाव टाकलं आहे. हे जे लिखाण आहे त्याला महाराष्ट्राच्या संस्कृतीत जागा नाही. त्याचा आम्ही तीव्र शब्दांत निषेध करतो", अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली.
"महाराष्ट्राच्या राजकारणात बरीच वर्ष कार्यरत असलेल्या शरद पवारांविरुद्ध तिनं किंवा त्या भावेनं हे लिहिणं साफ गैर आहे. विचारांचा मुकाबला विचारांनी करायचा असतो. एखादा हलका विनोद वगैरे आपण समजू शकतो, त्यातली विनोदबुद्धीही आपण ओळखतो. तशा टीका महाराष्ट्राला नव्या नाहीत.! आमचे त्यांच्याबरोबर मतभेद जरुर आणि आहेत आणि राहतील, परंतु अशा घाणेरड्या पातळीवर येणं साफ चूक आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, हे इथे स्पष्टपणे सांगणे गरजेचं आहे. असं लिहिणं ही एक प्रवृत्ती नव्हे तर मानसिक विकृती आहे, तिला वेळीच आवर घालायला पाहिजे", असं राज ठाकरे रोखठोकपणे म्हणाले.
("चोप दिल्याशिवाय शांत बसणार नाही" केतकी चितळेच्या FB पोस्ट नंतर राष्ट्रवादीची आक्रमक भूमिका)
"चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणणं हेच आजपर्यंत आपल्या महाराष्ट्रातल्या महापुरुषांनी, संतांनी तसेच असंख्य बुद्धीमान विचारवंतांनी आपल्याला शिकवलं! कोणीही या राज्याची परंपरा खालच्या पातळीवर नेऊ नये हीच अपेक्षा", असं ते म्हणाले.
"पोस्ट लिहिणाऱ्या व्यक्ती या खरंच आहेत की नवा वाद उकरुन काढण्यासाठी कोणाची तरी उठाठेव सुरु आहे हे देखील तपासणे गरजेचे आहे. कारण या अशाच चार-दोन विकृत टोळक्यांमुळे समाजा-समाजामध्ये तेढ निर्माण होते, समाज दुभंगतो. द्वेषाची पातळी किती खालपर्यंत आली आहे हे आता राज्यकर्त्यानाही समजलं असेलच. हे सगळं महाराष्ट्रात वेळीच आवरणं गजेचं आहे. कारण महाराष्ट्राची ओळख वेगळी आहे. म्हणूनच, राज्य सरकारने याचा नीट छडा लावून या गोष्टींचा ताबडतोब बंदोबस्त करावा", असं आवाहन राज ठाकरेंनी केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.