मुंबई, 29 सप्टेंबर: गुलाब चक्रीवादळाचा परिणाम म्हणून गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाने झोडपून काढलं आहे. काल दिवसभर झालेल्या मुसळधार पावसामुळे मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. काल मराठवाड्यात मुसळधार पावसामुळे घडलेल्या विविध अपघातात एकूण 21 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आजही राज्यात गुलाब चक्रीवादळाचा परिणाम कायम राहणार आहे. पुढील चोवीस तासांसाठी हवामान खात्याने राज्याला सतर्कतेचा इशारा दिला आहे.
आज सकाळपासूनच मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड जिल्ह्यात पावसाचं धुमशान पाहायला मिळेल, अशी माहिती भारतीय हवामान शास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. संबंधित जिल्ह्यांवर मुसळधार पावसाचे काळे ढग घोंघावत आहेत. त्यामुळे मुंबईकरांनी सकाळी ऑफिसला जाताना, विशेष काळजी घेण्याचा सल्ला हवामान तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे. पुढील दोन-तीन तासांत मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता आहे.
हेही वाचा-खोपोलीत धबधब्यात भिजणे जिवावर बेतले, 2 महिलांचा मृत्यू; 8 वर्षांचा चिमुरडा बेपत्
महाराष्ट्रात मुंबईसह कोकण किनारपट्टी आणि मराठवाडा भागात येत्या 24 तासांत अतिवृष्टी (Heavy Rain in Mumbai) होण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने मंगळवारी संध्याकाळी ही माहिती दिली. आयएमडी मुंबईचे वरिष्ठ शास्त्रज्ञ के. एस होसाळीकर (K S Hosalikar) म्हणाले की, “गुलाब चक्रीवादळाचा (Gulab Cyclone) उर्वरित प्रभाव मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात कायम राहील आणि काही ठिकाणी अतिवृष्टी होईल. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या उत्तर भागात बुधवारी अधिक पाऊस पडेल.
हेही वाचा-LIVE Updates : पैनगंगा नदीला पूर, वाहतुकीवर परिणाम
दुसरीकडे, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळे दक्षिण पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पावसाची (Heavy Rain in Bengal) शक्यता आहे. विभागाने मंगळवार आणि बुधवारी या भागातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस किंवा विजांच्या गडगडाटासह पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mumbai, Weather forecast