मुंबई, 3 जून: 'निसर्ग' चक्रीवादळानं रौद्र रूप धारण केलं आहे. आता कुठल्याही क्षणी ते किनारपट्टीवर धडकेल, अशी माहिती हवामान विभागानं दिली आहे. दरम्यान, निसर्ग चक्रीवादळानं दिशा बदलली असून ते 50 किलोमीटर दक्षिणेकडे सरकलं आहे. आता ते मुरुडला धडकणार आहे. तरी देखील या चक्रीवादळाचा धोका मुंबईसह कोकण किनारपट्टीवर होणार आहे.
'निसर्ग' चक्रीवादळ आता कोकणाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचलं आहे. रायगड जिल्ह्यातील मुरुड, अलिबाग परिसरात या वादळाचा परिणाम जाणवू लागला आहे. हे वादळ मुंबईपासून जवळपास 130 किमी अंतरावर पोहोचलं आहे. रायगड, रत्नागिरीत, सिंधुदुर्गात वाऱ्याने जोरदार वेग पकडला असून वाऱ्याचा वेग ताशी 100 ते 110 किमी आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर आणि दापोली परिसरात चक्रीवादळाचा फटका बसायला सुरूवात झाली आहे. वादळी वाऱ्यामुळे अनेक झाडे उन्मळून पडली आहेत. जनजीवन विस्कळीत झालं आहे.
चक्रीवादळाचा प्रभाव आज आणि उद्या महाराष्ट्रावर पडण्याची शक्यता आहे.
मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या वादळाचा सर्वाधिक फटका हरिहरेश्वरसह अलिबागला बसण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, इगतपुरी, नाशिक,चांदवड, मालेगाव असा निसर्ग चक्रीवादळाचा वेग असणार आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.