मुंबई, 4 एप्रिल : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या प्रत्येक दिवशी वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी लोकांना संयमाचं आवाहन केलं, पण समाजात दुही माजवणाऱ्यांना कडक शब्दांत इशारा दिला आहे. ‘समाजात काही विकृत व्हायरस आहेत. समाजात दुही माजवणाऱ्यांना माझ्या कायद्याच्या कचाट्यातून कुणीही वाचवू शकणार नाही,’ असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ‘मरकजवरून राज्यात आलेल्या सर्वांचा शोध लावला आहे. ते सर्वजण विलगीकरण कक्षात आहेत. पण अजूनही कोणी बाहेर फिरत असेल तर सर्वांनीच जबाबदारी घेऊन असा कोणी आढळल्यास त्याबाबत प्रशासनाला माहिती द्यायला हवी. काही मुल्ला, मौलवीही माझ्या संपर्कात…त्यांच्याशी बोलून सूचना दिल्या आहेत,’ अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. उद्धव ठाकरे यांच्या संबोधनातील ठळक मुद्दे: - माझ्या महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकाचं मी रक्षण करणारच - 51 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले - पुढील सूचना येईपर्यंत महाराष्ट्रात कोणताही राजकीय किंवा धार्मिक उत्सव होणार नाही - सर्वांनी आपला सण, उत्सव घरात साजरा करावा - सर्व पक्षाचे नेते तसंच सर्व धर्माचे धर्मगुरू माझ्या संपर्कात - इतर राज्यातील मजुरांचीही जे इथं अडकलेत त्यांची आपण जबाबदारी घेतली आहे - परराज्यातील मजुरांनी सैरभैर होऊ नये - हा शिवरायांचा महाराष्ट्र आहे…आपण लढणार आणि जिंकणार - माझा माझ्यापेक्षाही तुमच्यावर विश्वास… - घऱाबाहेर पडताना स्वच्छ रुमाल तोंडाला बांधून बाहेर पडा - भाजी मार्केट 24 तास खुली असतानाही गर्दी का करताय? - माझे वडील बाळासाहेब ठाकरे म्हणतात त्याप्रमाणे आत्मविश्वासासारखं दुसरं बळ नाही, आज आत्मविश्वासाची गरज आहे - कोरोना आपली परीक्षा बघतोय, त्याच्यासमोर गुडघे टेकता कामा नये - लढायला आम्ही मागे पुढे पाहात नाही
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.