नवी दिल्ली, 18 ऑगस्ट: पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा नववा हप्ता (9th Installment of PM Kisan Scheme) जारी करण्यात आला आहे. दरम्यान 9 कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम पोहोचली आहे. सरकारने लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे थेट पाठवले आहेत. मात्र अद्यापही काही शेतकरी असे आहेत ज्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही, शिवाय असेही काही आहेत जे अपात्र असून त्यांना 2000 रुपये खात्यात जमा झाले आहेत. या शेतकऱ्यांना लाभार्थी नसूनही या योजनेचा लाभ घेतला आहे. ज्या लोकांनी चुकीच्या पद्धतीने पीएम किसान योजनेचा (PM KISAN) फायदा उचलला आहे, त्यांच्याकडून हे पैसे वसूल करण्याचं काम सरकारने सुरू केलं आहे. अनेक राज्य सरकारांनी अशा लोकांना रिकव्हरी नोटीस (Recovery Notice) जारी करून वसूली सुरू केली आहे. सरकारचं 2900 कोटींचं नुकसान बनावट आधार कार्ड देऊन या योजनेचा लाभ घेणाऱ्यांची संख्या 3.86 लाख आहे. तर करदाते असूनही योजनेचा लाभ मिळवणाऱ्यांची संख्या 2.34 लाख आहे. शिवाय 32 हजार मृत शेतकऱ्यांच्या खात्यात 2000 रुपयांची रक्कम जमा झाली आहे. अशाप्रकारे विविध कारणांमुळे देशभरात 42 लाख अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेची रक्कम जमा झाली आहे. त्यामुळे सरकारला एकूण 2900 कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. कुठे जमा करावी लागेल रक्कम? अनेक राज्यात पती-पत्नी दोघांना फायदा, मृत शेतकरी, चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर, बनावट आधार, करदाते-पेन्शनधारकांना फायदा इ. प्रकरणं समोर आली आहेत. या अपात्र शेतकऱ्यांकडून त्यांना पाठवण्यात आलेली रक्कम वसूल करण्याचे काम सुरू आहे. अपात्र शेतकऱ्यांना कृषी उपसंचालक कार्यालयात ही रोख रक्कम जमा करावी लागेल. रक्कम जमा केल्यावर त्यांना एक पावती दिली जाईल. नंतर, विभाग सरकारच्या खात्यात ही रक्कम जमा केली जाईल आणि अपात्र शेतकऱ्याचा डेटा ऑनलाइन पोर्टलवरुन हटवण्यात येईल. या शेतकऱ्यांकडून परत घेतली जाईल PM Kisan ची रक्कम -PM Kisan चा फायदा घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वत:ची जमीन असणं आवश्यक आहे. तुम्ही दुसऱ्याची जमीन भाड्याने घेऊन कसत असाल तरी या योजनेचा लाभ मिळणार नाही. जर शेतजमीन वडील किंवा आजोबांच्या नावावर असेल तरी या योजनेचा फायदा घेता येणार नाही. अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळाला असेल तर त्यांच्याकडून पैसे वसूल केले जातील -केंद्र सरकार/ राज्य सरकार आणि PSUs मध्ये सध्या काम करत असणारे किंवा सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचारी (मल्टी टास्किंग स्टाफ /चतुर्थ वर्गीय आणि ग्रुप डी कर्मचारी सोडून) -असे शेतकरी कुटुंब ज्यामधील एक किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती पुढील श्रेणीत येतात- व्यावसायिक डॉक्टर, इंजिनिअर, वकील, सीए, आर्किटेक्ट मंडळी - घटनात्मक पदावरील शेतकरी, आजी आणि माजी मंत्री, लोकसभा आणि राज्यसभा खासदार, आमदार, महापौर, नगराध्यक्ष, जिल्हापरिषदेचे अध्यक्ष हे सर्व या योजनेच्या बाहेर आहेत -केंद्र आणि राज्य सरकारमधील 10 हजारांपेक्षा जास्त पेन्शन घेणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देखील शेतीसाठी या योजनेचा लाभ मिळत नाही. -एकाच कुटुंबातील अनेक लोकं या योजनेचा वेगवेगळा फायदा घेऊ शकत नाहीत. आपल्यासह पती-पत्नी, भाऊ-बहीण यांच्यासाठी योजनेचा लाभ घेतला तर ही रक्कम वसूल केली जाईल -मागील वर्षात आयकर भरणारे शेतकरी देखील या योजनेच्या बाहेर आहेत. त्यामुळे अशांनी देखील योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यांच्याकडून रक्कम वसूल केली जाईल. -चुकीची माहिती देऊन योजनेचा फायदा घेणाऱ्यांकडून देखील रक्कम परत घेतली जाईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.